![]()
शहरातील रेल्वे लाईन पलीकडील भागाचा वीज पुरवठा ग्रामीण वाहिनीवरून काढून तो तात्काळ अंजनगाव शहराच्या मुख्य वीज वाहिनीला जोडण्यात यावा, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
.
युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका संघटक निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. अंजनगाव सुर्जी शहरातील रेल्वे लाईन पलीकडचा भाग हा तांत्रिकदृष्ट्या शहरातच येतो. मात्र, येथील वीज कनेक्शन शहराऐवजी ग्रामीण भागाच्या वीज वाहिनीला जोडण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा किंवा किरकोळ नैसर्गिक आपत्ती आल्यास या भागातील वीज पुरवठा तासनतास खंडित होतो. अंजनगाव शहरात राहूनही केवळ ग्रामीण वाहिनीच्या जोडणीमुळे येथील नागरिकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी हे कनेक्शन तातडीने शहर वीज जोडणीला जोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शहराध्यक्ष अमोल कावरे, तालुकाध्यक्ष विठ्ठल ढोले, जिल्हा प्रवक्ता अमोल दाभाडे, तालुका उपाध्यक्ष राहुल रांगोळे, कार्याध्यक्ष राजाभाऊ बहादुरे, अतुल हागोने, मनोज येवले यांसह युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक सक्रिय कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते. आता या निवेदनावर वीज मंडळ काय पावले उचलते, याकडे अंजनगाव वासीयांचे लक्ष लागले आहे. ^नागरिक शहरात राहतात, मग वीस ग्रामीण वाहिनीची का ? हा अन्याय तात्काळ दूर करून प्रशासनाने रेल्वे लाईन पलीकडे निघालेल्या शहर वाहिनीशी हा भाग जोडावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. – निलेश देशमुख, तालुका संघटक, युवा स्वाभिमान पार्टी
नागरिक शहरात, वीज मात्र ग्रामीणची : आंदोलनाचा इशारा