![]()
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापू लागले असून मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आमरण उपोषणाच्या घोषणेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. 30 मेपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली. मात्र या भेटीनंतर ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत जरांगेंवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलताना आक्रमक भाषा वापरली. जरांगे, खुळखुळ्या तुला अक्कल नावाचा प्रकार नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, न्यायमूर्ती आले, सचिव आले, मुख्यमंत्रीही भेटून गेले, तरी जरांगेंच्या भूमिकेत बदल झाला नाही. मग एखादा हॉटेल चालवणारा किंवा झाडूपोछा करणारा व्यक्ती भेटून काय फरक पडणार? अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रसाद लाड यांच्यावरही निशाणा साधला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावरही उपरोधिक टीका केली. एक लाख लोकांना रोजगार दिल्याबद्दल त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा, असा टोला त्यांनी लगावला. आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत प्रसाद लाड यांना कितपत माहिती आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजकारणाचा फायदा घेत अजून मोठं व्हावं, पण आरक्षणाच्या विषयात उगाच हस्तक्षेप करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच भाजपच्या बळावर काही जण बेडकासारख्या उड्या मारत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही हाके यांनी यावेळी केला. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आम्ही ग्रामीण भागात शंभर सभा घेत आहोत, मात्र आम्हाला कोणताही निधी दिला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, मनोज जरांगे आंदोलनाची घोषणा करताच सरकारकडून शेकडो कोटी रुपयांच्या घोषणा केल्या जातात, असा आरोप त्यांनी केला. जातगणना व्हावी, ओबीसींचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी आम्ही सातत्याने लढत आहोत, मात्र शासनाकडून दुजाभाव केला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रसाद लाड यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना हाके म्हणाले की, त्यांनी आधी राजीनामा द्यावा आणि नंतर जातीचं राजकारण करावं. ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपला सत्तेत आणण्यात ओबीसी मतदारांचा मोठा वाटा असल्याचं सांगत त्यांनी सरकारला इशारा दिला. ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले. आक्रमक वक्तव्यांमुळे वातावरण तापले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. एका बाजूला सरकार चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे वातावरण अधिक तापत आहे. आगामी काही दिवसांत या वादावर राजकीय प्रतिक्रिया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Source link
मनोज जरांगेंवर टीका करताना लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली:म्हणाले- खुळखुळ्या तुला अक्कल नाही; लाड यांच्यावरही बोचरी टीका