![]()
शनिवार, रविवारी मध्यरात्री दोन अपघातांत ८ तरुणांसह १४ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील अपघात चालकाचा घाट वळणाचा अंदाज चुकल्याने घडला असावा, तर दुसरा धुळ्याच्या लळिंग घाटात चालकाने राँगसाइड टर्न घेतल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात दिसले. आंबेनळी घाटात ८०० फूटखोल दरीत कार कोसळली महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रायगड जिल्ह्यातील धोकादायक आंबेनळी घाटात दाभिळ टोक येथे शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ ८०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात सातारा जिल्ह्यातील ८ तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्व जण सहलीसाठी २२ मे रोजी रात्री निघून २३ मे रोजी पहाटे हर्णे (ता. दापोली) येथे समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले होते. शनिवारी दिवसभर सहलीचा आनंद लुटून ते रात्री दहाच्या सुमारास हर्णे येथून निघाले आणि मृत्यूने त्यांना ओढून नेले. काळोखी रात्र आणि रस्त्यावर फारशी वाहतूक नसल्याने गाडी खोल दरीत कोसळल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. आपली मुले नियोजित वेळेत घरी पोहोचली नाहीत. म्हणून काळजीपोटी एका पित्याने मुलाला ५० ते ६० कॉल केले. पण काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी चिंताग्रस्त होऊन शोधाशोध केली. तेव्हा अपघात झाल्याचे कळाले. २४ तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. दाभिळ टोक येथील तीव्र वळण आणि अंधारामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला असावा. आंबेनळी घाट अरुंद आणि अनेक वळणांचा आहे. या घाटात वाहनांचा वेग ताशी २५ ते ३० किमी एवढाच अपेक्षित आहे. प्रत्यक्षात स्कॉर्पिओ यापेक्षा अधिक वेगात असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. असे ओढले ८ तरुणांना काळाने जबड्यात १. शुक्रवार २२ मे (रात्री): ८ जण कोकणाकडे निघाले. २. शनिवार २३ मे (पहाटे): सर्वजण हर्णे (दापोली) समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले. दिवसभर समुद्रावर मौजमजा केली, मोबाईलवर स्टेटस ठेवले. ३. शनिवार २३ मे (संध्याकाळी ७:००): रितेशने वडिलांना फोनवर सांगितले की, रात्री जेवून १० वाजता निघणार. ४. शनिवार (रात्री १२:०० दरम्यान): आंबेनळी घाटातील दाभिळ टोक येथे गाडी दरीत कोसळली. ५. रविवार २४ मे (दिवसभर): पालकांच्या कॉलला प्रतिसाद नाही. ६. सोमवार २५ मे (पहाटे ५:०० ते सकाळी): दाभिळ गावाच्या बाजूने सावित्री नदीपात्राकडून ट्रेकर्स, पोलिसांनी मृतदेह वर काढले. अपघाताची ४ मुख्य कारणे असे असू शकतात १) आंबेनळी घाटातील दाभिळ टोक या अत्यंत अरुंद आणि तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने गाडी थेट दरीत गेली असावी. २)दाभिळ टोक येथे मजबूत लोखंडी किंवा काँक्रीटचे क्रॅश बॅरियर्स नव्हते. दगडी संरक्षक खांब गाडीचा वेग ,भार सहन करू शकले नाहीत. ३) तरुण शुक्रवारी रात्री साताऱ्यातून निघून शनिवारी दिवसभर समुद्रात फिरल्यामुळे थकले होते. रात्री जेवून लगेच निघाल्यामुळे चालकाला थकव्याने डुलकी लागली असावी. ४) अचानक समोर आलेल्या वाहनाला चुकवताना स्टिअरिंग लॉक होऊ शकते. मी ५०-६० कॉल केले, रिंग तर वाजत होती, पण तो मोबाइल उचलतच नव्हता राजेंद्र लोखंडे (अजिंक्यतारा रुग्णालयात सुरक्षा रक्षक) म्हणाले की, रितेश आणि त्याचे मित्र शुक्रवारी रात्री साताऱ्यातून निघून शनिवारी पहाटे हर्णेला पोहोचले. सायंकाळी सात वाजता रितेशने मला फोनवर सांगितले की, आम्ही रात्री १० वाजता निघणार आहोत. त्यानुसार ते निघालेही. पण रविवारी तो घरी आला नाही. मी दिवसभरात त्याला ५० ते ६० कॉल केले. रिंग वाजत होती. पण तो मोबाइल कॉल उचलत नव्हता. म्हणून पोलिसांना कळवले. रात्री एक-दोनच्या सुमारास आम्हाला कळले की गाडी दरीत कोसळली. राँगसाइड डंपर ट्रकवर धडकला, २ तासांनंतर लक्झरी धडकली मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारात पुन्हा ट्रॅफिक जाम आहे. तो टाळण्यासाठी वाळूचा डंपर चालक मनोज नरवाळने सुमारे ८ किमी आधी राँगसाइडने टर्न घेतला. हाच निर्णय त्याच्यासह ६ जणांसाठी अखेरचा ठरला. रविवारी मध्यरात्री दीड वाजता हा डंपर एका मालट्रकवर जाऊन आदळला. चक्काचूर केबिनमध्ये जखमी मनोजला काढले जात असताना सुमारे पावणेदोन तासांनी १२० च्या वेगाने येणारी लक्झरी बस मालट्रकच्या मागील बाजूस धडकली. त्यात लक्झरी चालक जावेद खान तसेच अन्य दोन जण तर मदतकार्य करणारा गणेश थोरात व अन्य एका व्यक्तीसोबत मनोज ही जागीच ठार झाला. तर २६ प्रवासी जखमी झाले. मुलाच्या उपचारांसाठी आई अधीर लक्झरी बसमध्ये चालकाच्या मागे दोन सीट सोडून ८ वर्षांचा चिमुरडा शिवाय महाजन आपली आई सुरभी आणि आजीसोबत प्रवास करत होता. शिवायची आई सुरभी, आजीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. पण, अशा अत्यंत कठीण प्रसंगातही सुरभी यांच्यातील ‘माता’ जागी झाली. त्यांनी धैर्याने बसची काच फोडली. मदतीसाठी धावून आलेल्या लोकांना खिडकीवाटे सर्वप्रथम मुलगा शिवाय याला सुरक्षित बाहेर सोपवले. अपघातातील मृत युवक रितेश लोखंडे (२२, आसगाव) सुहास लोखंडे (२०, आसगाव) करण शिंगटे (२१, मर्ढे) निखिल शिंगटे (२५, मर्ढे) महेश पवार (२५, आसगाव) आदित्य साळुंखे (२१, आसगाव) संदीप काटकर (३७, खटाव) अंश चव्हाण (१९, बोरगाव)
Source link
मध्यरात्रीच्या 2 अपघातांत 14 ठार:एका घटनेत वळणाचा अंदाज चुकल्याने तर दुसऱ्यात चालकाचा राँगसाइड टर्नने मृत्यू ओढवला