![]()
संसाररूपी भवसागरातून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच भगवंताची प्राप्ती करण्यासाठी भक्ती हा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ मार्ग आहे. भगवंताच्या निस्सीम भक्तीमुळे मानवाच्या जीवनात सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त होते. भगवंताची भक्ती करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वयाची आवश्यकता नसते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ध्रुवाचे चरित्र होय, असे प्रतिपादन भागवताचार्य तथा ज्योतिषाचार्य पंडित सुदर्शन शर्मा यांनी केले. ते गोरक्षण रोड परिसरातील दत्त कॉलनी येथील साई मंदिरामागे असलेल्या गोकुळधाम येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित श्रीमद्भागवत कथेमध्ये हितोपदेश करीत होते. श्रीमद्भागवत कथेमध्ये पं. शर्मा यांनी भगवान श्रीकृष्णांच्या विविध दिव्य लीलांचे सुंदर वर्णन केले. ध्रुव चरित्र, कपिलोपाख्यान, अजामिलोपाख्यान तसेच भगवान नृसिंह अवताराच्या कथांचे सविस्तर निरूपण करताना त्यांनी सांगितले की, दृढ श्रद्धा, अतूट विश्वास, निष्काम भक्ती यांच्या बळावर भगवंताची कृपा सहज प्राप्त होते. ध्रुवाने लहान वयात कठोर तपश्चर्या करून भगवंताची कृपा संपादन केली. प्रल्हादाने प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताचे स्मरण सोडले नाही. भगवान नृसिंह अवताराची कथा भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत कोणतेही रूप धारण करू शकतात, हा संदेश देणारी आहे, असे त्यांनी सांगितले.
Source link
भगवंताची भक्ती करण्यासाठी वयाचे बंधन नसते- सुदर्शन शर्मा