![]()
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात निष्पक्ष न्यायाची मागणी करत आज पुण्यात ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ आणि ‘गुलाबो गँग’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली . या परिषदेत केतन अग्रवालच्या संशयास्पद मृत्यूशी संबंधित अनेक महत्त्वाचे कागदोपत्री पुरावे, आवश्यक माहिती आणि कागदपत्रे माध्यम प्रतिनिधींसमोर जाहीर करण्यात आली. पत्रकार परिषदेला संबोधित करताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सत्य दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक इशारा दिला. “केतन अग्रवालच्या कुटुंबावर जे असीम दुःख कोसळले आहे, ते या देशातील इतर कोणत्याही आई-वडिलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठीच आम्ही हा संघर्ष उभा केला आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हा लढा केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित नसून, देशातील प्रत्येक तरुणाच्या सुरक्षिततेचा आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाचा कोणताही राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक दबाव न बाळगता अत्यंत निष्पक्ष, सखोल, पारदर्शक आणि वेळबद्ध तपास करण्यात यावा, अशी आग्रही मागणी या संघटनांनी केली आहे. तपासादरम्यान ज्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळतील, त्यांच्यावर कोणतीही हायगय न करता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही यावेळी सांगण्यात आले . या पत्रकार परिषदेस प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये अध्यक्षा संगीता तिवारी, कार्याध्यक्षा रूपाली पाटील, उपाध्यक्षा शोभा पुणेकर, उपाध्यक्षा सोना आव्हाड आणि सचिव भारती लोंढे यांचा समावेश होता . “केतन अग्रवालला न्याय मिळालाच पाहिजे!” आणि “सत्य दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला जाईल!” अशा घोषणा देत, न्यायाचा हा लढा शेवट पर्यंत सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Source link
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी न्यायाची मागणी:‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’ आणि ‘गुलाबो गँग’ आक्रमक