Headlines

सरकार इतकं असंवेदनशील का?:सोनम वांगचुक यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल, संसदेत सरकारला घेरण्याचा इशारा




दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला रविवारी २० दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आगामी २० तारखेला संसदेचे कामकाज सुरू होताच, आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार असल्याचे सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे आगामी अधिवेशनात विरोधक आक्रमक राहतील, हे स्पष्ट झाले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी सोनम वांगचुक यांच्या भेटीनंतर संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थेट लक्ष्य केले. सध्या देशात सुरू असलेल्या शिक्षण विभागातील गोंधळाच्या आणि विविध प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ही अत्यंत मोठी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, “आगामी २० तारखेला जेव्हा संसदेचे सत्र सुरू होईल, तेव्हा आम्ही हा संपूर्ण मुद्दा अत्यंत ताकदीने सभागृहात मांडू. या सर्व प्रश्नांना जबाबदार धरून आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी संसदेत करणार आहोत.” असंवेदनशील सरकारवर ताशेरे सोनम वांगचुक सलग २० दिवस उपोषणाला बसले असताना आणि त्यांची प्रकृती चिंताजनक पातळीवर पोहोचली असतानाही सरकारने घेतलेल्या भूमिकेवर सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “हे केंद्र सरकार अतिशय असंवेदनशील आणि बधिर आहे. देशातील एक महत्त्वाचा व्यक्ती २० दिवस अन्नत्याग करून बसला आहे, मात्र सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधण्याची तसदी घेतलेली नाही. लोकशाहीत सरकारने किमान चर्चेसाठी तरी पुढे यायला हवे होते, पण त्यांनी जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे,” अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी सरकारच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. उपोषण सोडण्याची नम्र विनंती वांगचुक यांची खालावलेली प्रकृती पाहता सुप्रिया सुळे यांनी त्यांना आपले हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. “तुमचा जीव आमच्यासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही उपोषण सोडावे,” अशी विनंती केली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि संपूर्ण ‘इंडिया’ आघाडी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून हा लढा आपण एकत्रितपणे संसदेत लढू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारने तातडीने लक्ष घालण्याची मागणी सोनम वांगचुक यांच्या मागण्या आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील गंभीर विषय या दोन्ही मुद्यांवर भारत सरकारने आता तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे सरकारला महागात पडू शकते, असा इशारा देत ‘इंडिया’ आघाडी आता या विषयावरून रस्त्यापासून ते संसदेपर्यंत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *