आपल्या कडक स्वभावासाठी आणि सभागृहातील चौफेर आक्रमक शैलीसाठी नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांचा संताप आता एका शासकीय बैठकीत पाहायला मिळाला आहे. रत्नागिरी येथे आयोजित ‘दिशा’ आणि ‘रस्ता सुरक्षा’ स
.
रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे ‘दिशा’ आणि ‘रस्ता सुरक्षा’ समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने सर्व सदस्यांना दूरदृश्य प्रणालीची लिंक पाठवणे आवश्यक होते.
अधिकृत वेळापत्रकानुसार ही बैठक दुपारी १२ वाजता सुरू होणार होती. मात्र, प्रशासनाकडून आमदार भास्कर जाधव यांना वेळेत व्हीसी लिंकच पाठवण्यात आली नाही. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत लिंक न मिळाल्यामुळे भास्कर जाधव यांना वाट पाहावी लागली. या दीड-दोन तासांच्या कालावधीत मुख्य असलेली ‘दिशा समिती’ची बैठक संपली देखील होती.
आमदार म्हणजे काय समजता? जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले
अखेर दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास जेव्हा ‘रस्ता सुरक्षा समिती’ची बैठक सुरू झाली, तेव्हा कुठे आमदार भास्कर जाधव यांना लिंक मिळाली. ऑनलाईन जॉईन होताच जाधव यांचा पारा चढला आणि त्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
“आमदार म्हणजे तुम्ही काय समजता? आम्हाला बैठक आहे हे कळवण्याचा किंवा वेळेत लिंक पाठवण्याचा साधा शिष्टाचारही प्रशासनाला ठाऊक नाही का? ही नेमकी कसली कार्यपद्धती सुरू आहे?” असा जळजळीत सवाल त्यांनी थेट निवासी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला.
जिल्हाधिकाऱ्यांना सुनावल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा थेट बैठकीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे वळवला. एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे बैठकीपासून वंचित ठेवणे हा प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस असल्याची टीका करत त्यांनी या संपूर्ण हलगर्जीपणाचा जाब विचारला.
आशिष शेलारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
काही दिवसांपूर्वीच विधिमंडळ अधिवेशनात आणि जाहीर सभांमध्ये आपल्या आक्रमक विधानांमुळे भास्कर जाधव चर्चेत राहिले होते. विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या एका विधानावरून मोठा वादही निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शासकीय बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने पुन्हा एकदा त्यांच्या आक्रमकतेची चर्चा रंगली आहे.
दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नुकतीच आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. या अनपेक्षित भेटीनंतर आता कोकणच्या आणि विशेषतः रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
हे ही वाचा…
‘वर्षा’ बंगल्यावर जयंत पाटलांना भेटलो नाही:राष्ट्रवादीला अर्थखातं हवं; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटणार- सुनील तटकरे

जयंत पाटील आणि माझी वर्षा बंगल्यावर भेट झाली नाही. ते त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात तिथे गेले होते हे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील जे प्रश्न केंद्र सरकारकडे राखीव आहेत त्यावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, जर भेट राजकीय असती तर आम्ही त्याबद्दल सुनेत्रा पवारांना माहिती दिली असती. जो आदर आम्ही दादांचा करत होतो तोच आदर आम्ही सुनेत्रा पवार यांचा करतो, रवी राणा मोठे नेते आहेत मी छोटा माणूस आहे त्याच्यावर बोलू शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…