![]()
श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जून महिना कोरडा गेल्यावर, जुलैतील सुरुवातीच्या पावसावर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र, आता पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने कोवळी पिके उन्हाच्या झळांमुळे करपू लागली आहेत. निसर्गाच्या या लहरीपणामुळे महागडे बियाणे, खते आणि मेहनत वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा पुरता हतबल झाला असून आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.सध्या जमिनीत ओलावा नसल्याने कापूस, सोयाबीन, मका या पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी स्प्रिंकलर व ठिबकद्वारे पिके जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु विहिरी आणि बोअरवेलने तळ गाठल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.लक्ष्यांकापेक्ष ा पेरणी घटली. तालुका कृषी विभागाने यंदा ३६ हजार ६२२ हेक्टरवर खरीप पेरणीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात केवळ २२ हजार ५१२ हेक्टरवर (७५ टक्के) पेरणी झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थगणित हे पूर्णपणे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. यंदा मात्र जून महिन्यापासूनच पावसाने ओढ दिली आहे. जूनपासून मोजकाच पाऊस पडल्याने तिथे कशीबशी पेरणी उरकण्यात आली; परंतु आता पावसाने दीर्घ ओढ दिल्याने उगवून आलेली कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. ही नाजूक स्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांची शेतात धावपळ सुरू आहे. काही ठिकाणी पिकांमधील कोळपणी व खुरपणीची कामे सुरू असली, तरी बहुतांश उजाड शिवार अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून कापूस, सोयाबीन, मका,आदी पिकांची पेरणी पूर्ण झाली. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने कोवळी पिके उन्हाच्या झळांनी करपू लागली आहेत.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून अनेक शेतांतील पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी रोपे सुकू लागली आहेत. विहिरी, बोअरवेल आणि शेततळ्यांतील पाणीसाठाही घटत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे, खते व मशागतीवर मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी हा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.वेळेत दमदार पाऊस न झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तालुक्यात प्रत्यक्षात झालेली खरीप पिकांची पेरणी सोयाबीन १७ हजार हेक्टर पैकी ११ हजार ४७१ हेक्टर,कापूस ७ हजार ६०० हेक्टर पैकी ५ हजार ८६७ हेक्टर,मका ४ हजार १०० हेक्टर पैकी ४ हजार ९५० हेक्टर असे एकूण २८ हजार ७०० हेक्टर वर पेरणी झाली आहे.तर इतर तूर २०८ हेक्टर पैकी ११४ हेक्टर,मूग १३० हेक्टर पैकी १६ हेक्टर,उडीद २५ हेक्टर पैकी २ हेक्टर भुईमूग २३० हेक्टर पैकी ३५ हेक्टर,बाजरी ५१० हेक्टर पैकी ५७ हेक्टर असे एकुण १ हजार १०३ पैकी २२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तालुक्यात २९ हजार ८०३ हेक्टर पैकी २२ हजार ५१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.तालुक्यात केवळ ७५ टक्के पेरणी झाली आहे.
Source link
पावसाची प्रतीक्षा:श्रीरामपूर तालुक्यावर दुहेरी संकट! पाऊस गायब आणि विहिरी कोरड्या