![]()
वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालसंगोपन संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या अनाथ तरुणांना ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा नसल्याने मतदार यादीत नाव नोंदवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे. पुण्यातील ‘सनाथ वेल्फेअर फाऊंडेशन’ने या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून, रोहित पवार यांनीही या मोहिमेला पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांना या तरुणांना मतदानाच्या हक्कापासून वंचित न ठेवण्याची विनंती केली आहे. अनाथ मुलांपुढे कागदपत्रांचे मोठे आव्हान सामान्य नागरिकांनाच स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करताना अनेक अडचणी येत असताना, अनाथ मुला-मुलींची अवस्था किती बिकट असेल, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. बालसंगोपन संस्थांमधून बाहेर पडलेल्या १८ वर्षांवरील अनेक तरुणांकडे स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे नसतात. याचा थेट परिणाम त्यांच्या मतदार नोंदणीवर होत असून, ते मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ‘सनाथ फाऊंडेशन’चे मुख्यमंत्र्यांना साकडे या अनाथ मुलांच्या हक्कांसाठी पुण्यातील ‘सनाथ वेल्फेअर फाऊंडेशन’ने १९ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर निवेदन पाठवले आहे. या निवेदनानुसार, २०१९ मध्ये झालेल्या एका राष्ट्रीय अभ्यासात असे दिसून आले होते की, संगोपन केंद्रातून बाहेर पडणाऱ्या ६० टक्क्यांहून अधिक तरुणांकडे आवश्यक ओळखपत्रे किंवा निवासी पुरावे नसतात. त्यामुळे त्यांना सरकारी योजना, घरे आणि नागरिकत्वाचे हक्क मिळवण्यात सातत्याने अडथळे येतात. रोहित पवार यांनी याच फाऊंडेशनच्या मागणीला पाठिंबा देत शासनाने संवेदनशीलपणे पावले उचलण्याची मागणी केली आहे. “मी आई-वडिलांचा पुरावा कुठून आणू?” ‘सनाथ फाऊंडेशन’ने आपल्या पत्रात मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेचा संदर्भ दिला आहे. या प्रक्रियेत कागदपत्रांची सक्ती केल्याने बिहारमधील अनेक केअर लीव्हर्सना मतदार नोंदणी नाकारण्यात आल्याचा दाखला संस्थेने दिला आहे. “मी माझ्या आई आणि वडिलांचा पुरावा कुठून आणू?” असा प्रश्न एका अनाथ तरुणाने विचारल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कायमचा पत्ता आणि पालकांची ओळख नसणे, यामुळे या तरुणांना बहिष्काराचा सामना करावा लागणे, हे भारतीय संविधानाच्या कलम १४ आणि ३२६ (समानता आणि मतदानाचा अधिकार) यांचे थेट उल्लंघन असल्याचे संस्थेने म्हटले आहे. सर्वसमावेशक लोकशाहीसाठी रोहित पवारांचे आवाहन निवडणूक आयोगाने यापूर्वी दिव्यांग, बेघर आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना सामावून घेण्यासाठी जशी कौतुकास्पद पावले उचलली आहेत, तसाच दृष्टिकोन या अनाथ तरुणांसाठीही स्वीकारावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाच्या सध्या सुरू असलेल्या ‘SIR’ मोहिमेत ही अनाथ मुले-मुली वंचित राहू नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्याची विनंती रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे. हेही वाचा.. राज्यात पुन्हा पावसाचा कहर:कोकण, घाटमाथा, नाशिकसह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 12 तास महत्त्वाचे राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, घाटमाथा, नाशिक, मुंबईसह विविध जिल्ह्यांत संततधार सुरू असताना भारतीय हवामान विभागाने पुढील 12 तासांसाठी महाराष्ट्रासह देशातील 18 राज्यांना मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. काही भागांत ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
Source link
मी आई-वडिलांचा पुरावा कुठून आणू?:अनाथ तरुणांच्या मतदार नोंदणीचा प्रश्न, रोहित पवारांचे सरकारला थेट आवाहन