![]()
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा काही संबंध नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. बारामती येथे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थोडक्यात “काही संबंध नाही,” असे उत्तर दिले. विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण का आले? गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला होता. दिल्लीत पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्याआधी जंतर-मंतर येथील आंदोलनानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली होती. या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले होते. तसेच, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानेही दोन्ही गटांच्या भवितव्याबाबत चर्चांना आणखी हवा मिळाली होती. भाजप नेतृत्वाने शरद पवार गटाने विलीन होऊनच एनडीएमध्ये यावे, अशी भूमिका घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या सर्व चर्चांवर विराम लागण्याची शक्यता आहे. रोहित पवारांचा एनडीएत जाण्यास नकार दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनीही शरद पवार एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांचा इन्कार केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठीच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. “मी लोकांसोबत आणि विचारांसोबत राहिलो आहे. पुढेही लढत राहणार आहे. मी कोणत्याही परिस्थितीत एनडीएसोबत जाणार नाही,” असे रोहित पवार यांनी ठामपणे सांगितले. कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबतही प्रतिक्रिया राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, सरकारने टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आणखी सुमारे पंधरा दिवस वाट पाहून त्यानंतरच प्रतिक्रिया देऊ. तर, नीट आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीबाबत विचारले असता त्यांनी “बघूया, काय चर्चा होते” अशी संक्षिप्त प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांच्या “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही” या स्पष्ट विधानामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चांना मोठा धक्का बसला असून राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. हेही वाचा… MHT-CET परीक्षेतील पर्सेंटाईल फॅक्टर:पर्सेंटाइल म्हणजे काय? 12वीचे टक्के आणि CET पर्सेंटाईल एकच नसतात; सोप्या भाषेत समजून घ्या ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET) परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी ‘टक्केवारी’ (Percentage) आणि ‘पर्सेंटाईल’ (Percentile) यातील गल्लत टाळण्याचे आवाहन केले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात पर्सेंटाईल म्हणजे नेमके काय, हा प्रश्न असतो. हाच ‘पर्सेंटाईल फॅक्टर’ सोप्या भाषेत खालीलप्रमाणे समजावून सांगितला आहे: सविस्तर वाचा NEET सारखाच घोटाळा MH-CET परीक्षेतही!: बारावीला 35-40 टक्के असणाऱ्यांना CET मध्ये 100 पर्सेंटाईल कसे? सचिन सावंतांचा सवाल नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आणखी एक गंभीर गौप्यस्फोट केला आहे. सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर जर तरुण पिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूक आहे. नीट पेपरफुटीची चौकशी सुरू असली तरी अशा प्रकारच्या चौकशीतून पुढे काहीही निष्पन्न होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. तसेच नीट सारखाच गडबड घोटाळा MH-CET परीक्षेतही झाला आहे. दहावी बारावीला जेमतेम 35-40 टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांना MH-CET परीक्षेत 100 पर्सेंटाईल पडलेले आहेत, हा घोटाळा असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. सविस्तर वाचा
Source link
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही:विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्ट उत्तर