![]()
अहिल्यानगर महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने श्रमिकनगर येथे ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियानाचा’ शुभारंभ महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानांतर्गत परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली तसेच नागरिकांमध्ये डेंगू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना सभापती बारस्कर म्हणाल्या, आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे. धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांकडे वळून शारीरिक तंदुरुस्ती राखावी, असे आवाहन त्यांनी केले. डेंगू हा अत्यंत जीवघेणा आजार असून त्यावर उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापासून आणि परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करून साचलेले पाणी तातडीने नष्ट करावे. एडिस डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियानामुळे शहरातील डेंगू रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक मनोज दुलम, नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, नगरसेविका रोशनी त्रिंबके, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ. धनंजय वारे, डॉ. पद्मा कुलकर्णी, विद्या एकलदेवी, श्याम पंगा उपस्थित होते. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज डॉ. वृषाली आरु म्हणाल्या, डेंगू हा एडिस इजिप्ती डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो. त्यामुळे घरात किंवा परिसरात पाणी साचू देऊ नये. पाण्याची भांडी कायम झाकून ठेवावीत, आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
Source link
मनपातर्फे शहरात डेंगूमुक्त अभियानाला सुरुवात:श्रमिकनगरमध्ये डेंगू जनजागृतीचा प्रभावी उपक्रम, परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन