![]()
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे मिरची खरेदीच्या हंगामाला सुरुवात झाली असून, या मिरची खरेदी-विक्री व्यवहारांमुळे उंडणगाव-गोळेगाव या मुख्य रस्त्यावर दररोज संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा मिरचीने भरलेले ट्रॅक्टर, ट्र
.
व्यापाऱ्यांकडून मुख्य रस्त्याचाच लोडिंग पॉइंट म्हणून सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. या कोंडीत दुचाकी, चारचाकी वाहने, शालेय बस, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवांची वाहने रोज अडकून पडत आहेत. वाहनधारकांना दररोज एक ते दीड तास रस्त्यावर ताटकळत राहावे लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नियम आणि वाहतूक व्यवस्था धाब्यावर बसवून हा प्रकार रोज सुरू असतानाही, संबंधित यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या मालवाहू गाड्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. विशेषतः संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ही परिस्थिती धोकादायक बनत असून, येथे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मुख्य रस्त्यावरील मिरचीचे लोडिंग तातडीने बंद करून व्यापाऱ्यांना खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी येथे तात्काळ पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दररोजच्या कोंडीमुळे स्थानिक वाहनधारक त्रस्त आहेत.
आमठाणा चौफुलीवर मिरची मार्केटमुळे वाहतुकीची कोंडी; नागरिकांची गैरसोय आमठाणा येथे मिरची मार्केट तेजीत असल्याने सिल्लोड–घाटनांद्रा आणि आमठाणा–केळगाव रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होत आहे. रविवारी केळगाव, धावडा, घाटनांद्रा, पेडगाव, चारनेर यांसह परिसरातील शेतकरी मिरची विक्रीसाठी आल्याने ट्रॅक्टर व पिकअप वाहनांमुळे रस्ता बंद झाला होता. आमठाणा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या मार्गावरून आपत्कालीन रुग्णवाहिकेची वर्दळ असते. अशा परिस्थितीत वाहन या कोंडीत अडकून अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.