![]()
स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि असंख्य नागरिकांनी दिलेल्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस कर्तव्याची जाणीव करून देतानाच राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकजुटीने विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य अनिल पाटील यांनी केले. येथील मविप्र समाजाच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष भिका सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. संगीत विभागप्रमुख प्रा. सोनाली गोसावी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण केले. राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) व राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड सादर केली. कार्यक्रमास स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र निकम यांनी केले. ‘वंदे मातरम्’च्या दीड शताब्दीनिमित्त स्पर्धा ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाविद्यालयात तिरंगा रॅलीसह मराठी विभागाच्या वतीने वक्तृत्व, रांगोळी व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. निबंध स्पर्धेसाठी ‘माझा भारत, माझी जबाबदारी : देशप्रेमाची नवी संकल्पना’, ‘देशभक्ती म्हणजे केवळ घोषवाक्य नव्हे! कर्तव्य आणि नागरिकत्व’ आणि ‘विविधतेत एकता : भारतीयत्वाची खरी ओळख’ हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी निबंध सादर केले.
Source link
विकसित भारतासाठी सक्रिय योगदान द्या:सटाणा महाविद्यालयात प्राचार्य अनिल पाटील यांचे प्रतिपादन