.

येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी करुणेश्वर महादेव संस्थानच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. १७ ऑगस्ट रोजी सकाळी वाघगड येथून महान धरणाचे पवित्र व शुद्ध जल २१ हंड्यांमध्ये घेऊन कावड यात्रेच्या मिरवणुकीस भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
ही कावड यात्रा दुपारी १२ वाजता महान येथे दाखल झाली. यावेळी कल्पना कॉलनी येथे पवन कांबळे मित्र परिवाराच्या वतीने सर्व कावडधारकांना थंड पाणी, चहा आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. कावड यात्रा कल्पना कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच भाविकांनी तिचे भक्तिभावाने पूजन केले. मिरवणुकीत बँडबाजा, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘हर हर महादेव’च्या गगनभेदी जयघोषाने संपूर्ण महान नगरी दुमदुमून गेली होती. सायंकाळी ४ वाजता महान नदीच्या तीरावरील पुरातन करुणेश्वर महादेव संस्थान येथे महादेवाच्या पिंडीवर विधिवत जलाभिषेक करून कावड यात्रेची सांगता करण्यात आली.
या कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष आकाश तायडे, उपाध्यक्ष वैभव सुलताने, उपसरपंच सुनील ढाकोलकर, किशोर देशपांडे, दादू महागावकर, सुमित इंगळे, अमोल तायडे, रवी महागावकर, गजानन नानोटे, पवन कांबळे, प्रवीण तायडे, विपुल ढाकोलकर, प्रशांत शेवलकर, पवन म्हसणे, प्रभुदास जवके, गोलू जानोरकार, शंकर पोफळे, अनुप देशमुख, हर्षल पाठक, नितीन इंगळे, प्रतीक खरात, किशोर निखाडे, नितीन जानोरकार, कुणाल जानोरकार, सूरज तायडे व बनचरे यांचे सहकार्य लाभले. कावड यात्रेदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंजर पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महान पोलिस चौकीचे मोरे, धामणे, वाघमारे आणि सिरसाठ यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिवभक्तांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कावड यात्रा उत्साह व भक्तिमय वातावरणात पार पडली. परिसरातील भाविकांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कावडधारी शिवभक्तांनी जल घेऊन भक्तिभावाने यात्रा पूर्ण केली.