![]()
कन्नड तालुक्यातील टाकळी शाहू येथील दलित वस्तीमधील विविध विकासकामांकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सोमवारी पंचायत समिती कन्नडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
.
निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्तीमध्ये सन २०२१-२२ मध्ये नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, बांधकाम होऊन अनेक वर्षे उलटूनही अद्याप या टाकीत पाणी सोडण्यात आलेले नाही. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जुन्या पाण्याच्या टाकीतून दलित वस्तीला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने नवीन टाकीतून तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दलित वस्तीमधील हायमास्ट खांबावरील दिवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. याबाबत १८ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेतही प्रश्न उपस्थित करून हायमास्ट दिवा दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही त्याची दुरुस्ती झालेली नसल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, मागण्यांची तातडीने दखल घेऊन न्याय मिळावा, अन्यथा १७ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य भारत जाधव, निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजू खरात, शहानवाज शहा, राजीव आव्हाड, संतोष खरात, विश्वनाथ आव्हाड, तौकल शहा, लड्डू शहा, प्रकाश खरात, समीर शहा, राम शेळके, काकासाहेब शेळके व राजू शेळके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.