Headlines

विद्यार्थ्यांच्या भूतबाधेचे भय घालवण्यासाठी कलेक्टर, एसपींचा आश्रमशाळेत मुक्काम:आदिवासींचा लढवय्या इतिहास सांगितला; सीईओ, प्रकल्प अधिकारीही सोबत होते




अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील डोमा येथील आदिवासी आश्रमशाळेत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी मुक्काम केला. भूतबाधेच्या भीतीने काही विद्यार्थ्यांनी शाळा सोडून घरी जाणे पसंत केले होते. ही भीती दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम, जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी आणि मेळघाटचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी येरेकर यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा सोडून शिक्षणाचा मार्ग स्वीकारण्याचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश दिला. आदिवासी समाजाला भगवान बिरसा मुंडा आणि तंट्या भिल्ल यांच्यासारख्या लढवय्यांची मोठी परंपरा लाभली आहे. मेळघाटातील आदिवासी वाघ आणि अस्वलांशीही लढायला घाबरत नाहीत, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी अनेक तास संवाद साधला. अंधश्रद्धेतून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचा अनुभव सांगत, शालेय जीवनातच आयएएस बनण्याचे स्वप्न कसे पाहिले आणि ते कसे पूर्ण केले, हे सांगितले. सत्यम गांधी आणि सिद्धार्थ शुक्ला यांनीही त्यांच्या यशामागे असलेली इच्छाशक्ती आणि मेहनतीची गोष्ट विद्यार्थ्यांसमोर मांडली. मुक्कामादरम्यान, सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. त्यानंतर त्यांनी मित्रांसारखे विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. विद्यार्थ्यांनी आयएएस आणि आयपीएस कसे झालात, असे प्रश्न विचारले. अधिकाऱ्यांनी त्यांची उत्तरे दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळाली. या भेटीत सर्व सनदी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय भूमिकेऐवजी पालकांसारखे मार्गदर्शन केले. त्यांनी आश्रमशाळेतील भूतांच्या दाव्यांना विरोध करत, विज्ञानाचा स्वीकार करण्याचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, भविष्यातील शिक्षणासाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *