![]()
भक्ती, कला आणि निसर्ग संवर्धनाचा त्रिवेणी संगम साधत अकोले नगरपंचायतीने “दिव्य मराठी’च्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला. ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७’ अंतर्गत ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव-निसर्गाशी नाते
.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, सोमेश्वर उर्फ बबलू धुमाळ, नगरसेवक नवनाथ शेटे, इंजि. प्रदीपराज नाईकवाडी, अमोल वैद्य यांच्यासह नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीचे महत्त्व, पीओपी मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण तसेच नैसर्गिक रंगांचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी सुबक गणेशमूर्ती साकारत कलात्मकतेसोबत पर्यावरण संवर्धनाची जाणीवही जोपासली. अभिनव पब्लिक स्कूल, परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल, अगस्ती विद्यालय व कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नगरपंचायतीने नागरिकांना पीओपी मूर्ती, प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून शाडू मातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक, जलविद्राव्य रंगांचा वापर करण्याचे आवाहन केले.
निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करावे तसेच घरगुती मूर्तींचे विसर्जन नदी-नाल्यात न करता नगरपंचायतीच्या कृत्रिम तलावात करावे, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, १४ ते २२ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव निबंध व सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छुकांनी २१ सप्टेंबरपर्यंत शहर स्वच्छता विभागाकडे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. ‘पीओपी टाळूया, शाडू माती स्वीकारूया; जलप्रदूषण व ध्वनिप्रदूषण रोखून स्वच्छ, सुंदर आणि हरित अकोले घडवूया,’ असा संदेश नगरपंचायतीच्या उपक्रमातून देण्यात आला.