![]()
तालुक्यात मागील ४२ दिवसांपासून पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे भीषण दुष्काळाची सावली अधिकच गडद झाली आहे. शेतकऱ्यांचे खरिपाचे गणित पूर्णपणे विस्कटले असून, डोळ्यांसमोर उभी असलेली हिरवीगार पिके आता पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तडफडत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्
.
सकाळी आशेने शेतात जायचे, सुकत चाललेल्या पिकांना पाहायचे आणि संध्याकाळी निरभ्र आकाशाकडे नजर लावून उसासे टाकत घराकडे परतायचे, असाच दिनक्रम सध्या बालानगर, आडुळ, खादगाव परिसरातील बळीराजाचा बनला आहे. तालुक्यात यंदा ७८ हजार हेक्टरवर खरीप पेरणी झाली होती. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा उदंड पीक येईल, असा विश्वास शेतकऱ्यांना होता. परंतु गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा पत्ता नसल्याने ४० हजार हेक्टरवरील पिकांची वाढ खुंटली आहे. मुरमाड जमिनीतील पिकांची अवस्था तर गंभीर बनली असून पिके करपून जात आहेत. पैठण तालुक्यात ४९ हजार ९४२ हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. सध्याचा काळ कपाशीच्या वाढीसाठी आणि बोंडधारणेसाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र, जमिनीतील ओलावा संपल्याने झाडांची वाढ खुंटली आहे. १,०३० हेक्टरवरील सोयाबीनची पाने पिवळी पडली असून, २,४०८ हेक्टर मका आणि १,३२५ हेक्टरवरील तुरीनेही पाण्याअभावी माना टाकल्या आहेत.
७८ पैकी ४० हजार हेक्टर पिके संकटात तालुक्यात यंदा ७८ हजार हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. यातील ४९ हजार ९४२ हेक्टर क्षेत्र कपाशी, मका २ हजार ४०८, बाजरी १ हजार ६८७, तूर १ हजार ३२५ आणि सोयाबीन १ हजार ३० हेक्टरवर आहे. सुरुवातीच्या पावसाने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा दाखविली; मात्र आता पावसाच्या प्रदीर्घ खंडाने आशेवर पाणी फिरणार असल्याची स्थिती आहे.
पाऊस झाल्यास पिकांना संजीवनी मिळेल उत्पादनात घट होण्याची शक्यता पुढील एक दोन दिवसांत दमदार पाऊस झाला तर ७८ हजार हेक्टरच्या खरिपाला नवसंजीवनी मिळू शकते; मात्र पावसाने आणखी दडी मारली तर ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान आणि उत्पादनघटीचे संकट अधिक गडद होण्याची भीती आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. – विकास पाटील, कृषी अधिकारी