![]()
राजानंद सुरडकर | कन्नड नरसिंगपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेतील १७० रायवळ आम्रवृक्षांचा लिलाव पार पडला. या त १३ लाख २५ हजारांची ऐतिहासिक बोली लागली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव व कृषी अधिकारी शांताराम वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वाधिक १५२ एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. यात २५ एकरात फळ रोपवाटिका तर १२७ एकरांत बीजगुणन केंद्र आहे. येथील १२४ आम्रवृक्षांना यंदा मोठ्या प्रमाणावर फळधारणा झाली आहे. या फळांच्या लिलावासाठी तालुक्यातील २४ व्यापाऱ्यांनी आपला उत्साह दाखवला. लिलावात इस्माईल इब्राहिम शेख यांनी १३ लाख २५ हजारांची बोली लावली. या रोपवाटिकेत रायवळ आंब्यांचे वैविध्य असून त्यांची नावेही तितकीच रंजक आहेत. यात संत्र्या, सोप्या, तुप्या, केळ्या, लंगड्या, खोबऱ्या, शेप्या, आखाज्या, मेहताब्या, पायऱ्या, नीलम, बेनिशान, शेंद्र्या, छत्र्या आणि लाल्या अशा प्रजातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे तुप्या आंबा चवीला अक्षरशः गावरान तुपासारखा लागतो, तर काल्या आंब्याला त्याच्या सुगंधामुळे मोठी मागणी असते. सहायक कृषी अधिकारी डी.एस. पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये १० लाख १ हजार रुपयांची बोली लागली, जो आतापर्यंतचा विक्रम होता. गेल्या वर्षी फळधारणा कमी असल्याने केवळ २ लाख ८२ हजार रुपये मिळाले होते. ^मोठे क्षेत्र असल्याने या ठिकाणी वानरांचा मोठा प्रादुर्भाव होतो. नैसर्गिक आपत्ती, राखण, तोडणी आणि वाहतूक खर्च वजा जाता ही रक्कम मिळते. यंदा अपेक्षेपेक्षा कमी व्यापारी सहभागी झाल्याने लक्ष्यांकापर्यंत पोहोचता आले नाही. — एस. जे. वाकळे, कृषी अधिकारी, फळरोपवाटिका, नरसिंगपूर गतवर्षी २.८२ तर यंदा १३.२५ लाख क्षेत्र मोठे असल्याने वानरांचा अधिक वावर येथील आंब्याला बाजारात मोठी पसंती : “^या रोपवाटिकेतील आंब्यांची चव खूप वेगळी आहे. इथल्या तुप्या आणि काल्या आंब्याला बाजारात मोठी पसंती मिळते.” – शेख गफार शेख महंमद, आंबा व्यापारी
Source link
नरसिंगपूरच्या आम्रवृक्षांची 13.25 लाख बोली:जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका 152 एकरांवर विस्तारलेली, आंब्यांच्या झाडांना मोठी फळधारणा