![]()
गंगापूर शहरात मागील सात-आठ वर्षांपासून नगर पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिका निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांनी नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची आठवण उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांना करून दिल्यावर त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे. या संदर्भात दि. १३ रोजी आमदार सतीश चव्हाण, नगराध्यक्ष संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन सांगितले की, निवडणुकीपूर्वी दादांनी गंगापूरकरांचा पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर अजित पवार यांच्या निधनामुळे हा विषय मागे पडला. त्यामुळे नगराध्यक्ष संजय जाधव यांनी पालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात या विषयाला प्राधान्य देऊन तो सोडवण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. हे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी निधीची व तांत्रिक बाबींची पूर्तता होणे आवश्यक होते. त्या दृष्टीने नगराध्यक्ष संजय जाधव यांनी आ. सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सर्व संबधित विभागांना याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आदेश दिले आहे. यावेळी राज्य सरचिटणीस दिलीप बनकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
Source link
गंगापूरचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश:आमदार सतीश चव्हाण, नगराध्यक्ष संजय जाधव यांनी घेतली होती भेट