मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर 19 दिवसांनंतर आपले उपोषण 90 दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आज (17 सप्टेंबर) पहाटे सरकारी शिष्टमंडळासोबत झालेल
.
पहाटे 5 वाजता पाटोद्यात बैठक; उपोषणाला 90 दिवसांची स्थगिती
मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणासाठी निघाले असताना, राज्य सरकारच्या वतीने तातडीने हालचाली करण्यात आल्या. आज पहाटे 5 वाजता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस हे बीडमधील पाटोदा येथे दाखल झाले. सरकारी शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात सुमारे दीड तास बंद दाराआड चर्चा झाली.
चर्चेनंतर जरांगे यांनी माध्यमांसमोर येत सांगितले की, “आम्ही उपोषण 90 दिवसांसाठी स्थगित करत आहोत, मात्र आंदोलन संपलेले नाही. सरकारने तातडीने जीआर काढून गॅझेटियरची अंमलबजावणी करावी. 58 लाख कुणबी नोंदींपैकी एकही नोंद कमी होणार नाही, याची शासनाने लेखी हमी द्यावी. जर सरकारने पुन्हा विश्वासघात केला, तर आम्ही थेट मुंबई गाठू.” तसेच मुंबईत आधीच पोहोचलेल्या १ लाख ७ हजार समर्थकांनी शांततेत माघारी परतावे, असे आवाहनही त्यांनी केले.
“देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे माझे वैरी नाहीत. समोरून वार झाला तरच आम्ही प्रत्युत्तर देतो. राधाकृष्ण विखे चुकत असले तरी त्यांच्यावर प्रेम करा, पण मंत्र्यांनी विनाकारण टीका केल्यास आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशाराही जरांगे यांनी दिला.
जरांगे उपोषण सोडण्यासाठी विखे पाटील, लाड यांच्या पाया पडले; अजय बारस्करांचे गंभीर आरोप
जरांगे यांनी आंदोलन स्थगित करताच अजय बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंच्या पडद्यामागच्या भूमिकेवर गंभीर ताशेरे ओढले. “समाजाला प्रत्यक्षात काहीही मिळालेले नसताना केवळ पोकळ आश्वासनांवर जरांगेंनी पुन्हा उपोषण सोडले आहे. आमच्यावरील ईडीच्या चौकशा थांबवा, वाळू आणि इतर आर्थिक प्रकरणांतील चौकशा बंद करा आणि मला सन्मानजनकरीत्या यातून बाहेर पडू द्या, अशी गयावया करत जरांगे हे मंत्री विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या पाया पडत होते. केवळ ईडीच्या धाकामुळेच हे उपोषण मागे घेतले गेले,” असा थेट आरोप बारसकर यांनी केला.
पांडुरंग तारक प्रकरणावरून ईडीकडे तक्रार
बारसकर म्हणाले, “पांडुरंग तारक नावाच्या व्यक्तीची आम्ही आधीच ईडीकडे (ED) तक्रार दाखल केली आहे. काहीही कामधंदा न करणाऱ्या या व्यक्तीने तब्बल २७ एकर जमीन कशी खरेदी केली? या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी सुरू झाल्याने ती दडपण्यासाठीच हे उपोषणाचे नाट्य रचले गेले होते.”
उपोषणाच्या नावाखाली धंदा
“गेल्या तीन वर्षांत मनोज जरांगे महाराष्ट्रात उपोषणाच्या नावाखाली निव्वळ धंदा करत आहेत. २३ डिसेंबर २०२३ रोजी ‘सरकारला एका तासाचाही वेळ देणार नाही’ असे ठणकावणारे जरांगे आता दोन वर्षांनंतर पुन्हा तीन महिन्यांची मुदत कशासाठी देत आहेत? उपोषण ताणायचे आणि थातूरमातूर आश्वासनांवर माघार घ्यायची, हाच यांचा खेळ सुरू आहे. वाशीच्या आंदोलनातून समाजाला काय मिळाले आणि यांच्या निकटवर्तीयांना काय मिळाले, हे आम्ही मुळासकट बाहेर काढणार आहोत.”
गॅझेटच्या नावाखाली दिशाभूल
“हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट किंवा औंध गॅझेटच्या नावाखाली जरांगे संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत. परभणी जातपडताळणी कार्यालयाने आधीच हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्रे देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. वितरीत करण्यात आलेली 21 हजार प्रमाणपत्रे या गॅझेटच्या आधारे दिलेली नाहीत. समाजाला भावनिक करून दोन समाजांमध्ये भांडणे लावणे आणि स्वतःची संपत्ती वाढवणे, यापलीकडे जरांगे काहीही करत नाहीत,” अशी खरमरीत टीका बारसकर यांनी केली.
एकीकडे जरांगे यांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत देत उपोषण स्थगित केल्याने मुंबईवरील संभाव्य आंदोलनाचे सावट तूर्तास टळले असले, तरी दुसरीकडे अजय बारसकर यांनी उपस्थित केलेल्या ईडी चौकशीच्या आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मराठा आरक्षण आंदोलनात अंतर्गत वादाचा नवा भडका उडाला आहे.
—————
हेही वाचा…
मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित:मराठा आरक्षणासाठी सरकारला 3 महिन्यांची मुदत; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली 20 दिवस उपोषणाला बसले होते. आज सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. मात्र आंदोलन सुरुच राहणार आहे. तर 3 महिन्यात सातारा गॅझेट लागू करा. सरकारला 3 महिन्यांचा वेळ देतो. जर भविष्यात सरकारने जर दगा फटका केला तर आता उपोषण करणार नाही थेट मुंबईत आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी