काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजप नेत्याने 30 लाख रुपयांना नीटचा पेपर विकत घेतला आणि त्यानंतर त्याने तो लाखो रुपयांत विकरून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा बाजार मांडला, असे त्यांनी
.
एनटीने गत 3 मे रोजी नीट 2026 ची परीक्षा घेतली होती. पण हा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, त्याच्या तारखा नंजर जाहीर केल्या जाणार आहेत. या प्रकरणी लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेल्याची टीका होत असताना आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी थेट भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा NEET पेपर लीक घोटाळा हा भाजपच्या संरक्षणाखाली चालणाऱ्या माफियांचा काळा चेहरा आहे. भारतीय जनता पार्टीचा नेता दिनेश बिंवाल याने 30 लाख रुपयांत NEET चा पेपर विकत घेतला आणि तो पुढे लाखो रुपयांत विकून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा बाजार मांडला. सोशल मीडियावर पेपर फिरवून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची थेट हत्या करण्यात आली.
दोन वर्ष रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज पुन्हा परीक्षा द्यावी लागत आहे, पण पेपर विकणारे आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारे लोक मात्र सत्तेच्या संरक्षणाखाली मोकाट फिरत आहेत. ही फक्त पेपरफुटी नाही, तर भाजपच्या काळात उभ्या राहिलेल्या भ्रष्ट व्यवस्थेची घाणेरडी वस्तुस्थिती आहे. 2024 मध्येही पेपरफुटी झाली, आता पुन्हा तीच घटना घडली. म्हणजे पेपर लीक हा अपघात नाही, तर भाजप राजवटीत चालणारा संघटित व्यवसाय बनला आहे. लाखो कुटुंबांची स्वप्नं उद्ध्वस्त होत असताना भाजप सरकारला ना लाज, ना जबाबदारी.
आज देशातील विद्यार्थी विचारत आहेत, मेहनत करणं चूक आहे का? कारण भाजपच्या राजवटीत गुणवत्ता हरते आणि माफिया जिंकतात, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही नीटचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची टीका केली आहे. ते म्हणाले, भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी दहावीचा निकाल लागताच #NEET च्या परीक्षेच्या तयारीला लागतात. सलग दोन वर्ष मेहनत करून बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी लगेच ही NEETची परीक्षा देतात. पण यंदाचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. यात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास तर आहेच पण त्यासोबतच पालकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाही तर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा आहे.
2024 साली देखील अशाच पद्धतीने पेपर फुटला होता. महत्वाच्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटतातच कसे? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई झाली? NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह यांना तात्पुरते पदावरून काढले गेले. पण नंतर लगेच त्यांना स्टील मंत्रालयात रुजू करण्यात आले आणि आता ते छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. म्हणजे ही जी यंत्रणा चुक करते, काही पैशांसाठी लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा जुगार करते, त्यांना बक्षिसे मिळतात पण विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय मिळतं? तर फक्त त्रास, असे त्यांनी म्हटले आहे.
लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा अन् कष्टाचा अवमान – रोहित पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटणे हा केवळ तांत्रिक बिघाड नसून, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या कष्टाचा घोर अपमान आहे. वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा खेळ खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
नाशिकमध्ये झालेली अटक हा केवळ हिमनगाचा शेंडा आहे; या घोटाळ्याचे मूळ शोधून सूत्रधारांना जाहीर फासावर लटकवले पाहिजे. विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने तात्काळ आणि पारदर्शक पावले उचलावीत, असे ते म्हणालेत.