पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला राज्य सरकारने ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावरून ही घोषणा केली, ज्यामुळे देशभरातील लाखो गणेशभक्तांच्या श्रद्धास्थानाला नवी ओळख मि
.
या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि मंदिराच्या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. १८९३ मध्ये स्थापन झालेल्या या ट्रस्टला १३५ वर्षांची समृद्ध परंपरा आहे. हे मंदिर केवळ भक्तीचे केंद्र नसून, समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनातही महत्त्वाचे योगदान देत आले आहे. दररोज हजारो भाविक देश-विदेशातून येथे दर्शनासाठी येतात.
यापूर्वी या मंदिराला जिल्हा नियोजन समितीकडून ‘क’ वर्ग दर्जा मिळाला होता. ट्रस्टचे सामाजिक कार्य आणि भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून मंदिराला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती.
‘अ’ वर्ग दर्जा मिळाल्याने मंदिर आणि परिसराचा तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळ म्हणून सर्वांगीण विकास वेगाने होईल. या दर्जामुळे राज्य सरकारकडून विकासासाठी थेट आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल. या निधीतून देश-विदेशातील भाविकांसाठी अद्ययावत दर्शन रांग व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्वच्छतागृहे, भक्तनिवास आणि आधुनिक सुरक्षा उपाययोजनांसारख्या पायाभूत सुविधा उभारणे शक्य होणार आहे. यामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल.
या निर्णयावर बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, “१८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा मिळवणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे पहिलेच गणेशोत्सव मंडळ आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मागणीला पाठिंबा देत ती पूर्ण केली. लाखो गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”
