‘मराठा समाजाच्या मुली ओबीसी नेत्यांची गोंडस मुले आणि पैसा पाहून त्यांच्या घरात घुसतात,’ असे संतापजनक आणि आक्षेपार्ह विधान करून राज्यभरात खळबळ उडवून देणारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी आता आणखी एक सनसनाटी आरोप केला आहे. “उदय सामंत यांना उपमुख्यमंत
.
नवनाथ वाघमारे यांचे नवे गंभीर आरोप
जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना वाघमारे यांनी थेट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला. “उदय सामंत हे शिंदे गटात अस्थिर आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे आहे, त्यामुळे ते स्वतः मनोज जरांगेंना कोट्यवधी रुपये देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात भुंकायला लावत आहेत. जेणेकरून शिंदेंचे महत्त्व कमी होईल. मध्यंतरी सामंत भाजपच्या संपर्कात होते आणि लवकरच ते भाजपवासी झालेले दिसतील. शिवाय, ते शिवसेनेतील (शिंदे गटातील) एक गट फोडण्याच्या तयारीत आहेत,” असा दावाही वाघमारे यांनी केला.
“प्रसाद लाड यांनाही मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. राज्य सरकारनेच या ‘सापाला’ दूध पाजले असून सरकारने दिलेल्या टेंडर्समधून त्यांनी अमाप संपत्ती गोळा केली आहे. आता तेच मनोज जरांगेला रसद पुरवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत.”
उद्या दंगल झाली, तर हे दोघेच जबाबदार असतील
वाघमारे पुढे म्हणाले की, “या दोघांनी रसद पुरवली नाही, तर जरांगे काहीच करू शकत नाही. ओबीसींचे आरक्षण संपवण्यासाठी या दोघांना पुढे केले जात आहे. उद्या राज्यात मराठा आणि ओबीसींमध्ये दंगल झाली, तर त्यासाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड हेच जबाबदार असतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या दोघांपासून सावध राहावे.”
मराठा महिलांवरील आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद
तत्पूर्वी, नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या महिलांबद्दल अत्यंत हीन दर्जाचे विधान केले होते. चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मंत्र्यांच्या घरात ‘सोयरे’ घुसले आहेत, असे म्हणत, “ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुले आणि पैसा दिसला की मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात,” असे ते म्हणाले होते. या विधानामुळे मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. नांदेडमध्ये मराठा समाजातील महिलांनी मोठा मोर्चा काढून, “वाघमारे नांदेडमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू,” असा थेट इशारा दिला आहे.
वाघमारेंच्या विधानावर नेत्यांच्या प्रतिक्रिया:
भर चौकात कान फोडले पाहिजेत – प्रवीण दरेकर : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी वाघमारे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “कुठलाही समाज असो, एखाद्या राजकीय कार्यकर्त्याकडून अशा प्रकारचे बेजबाबदार आणि घृणास्पद वक्तव्य येणे चुकीचे आहे. केवळ पब्लिसिटी मिळवण्यासाठी हे विक्षिप्त विधान केले आहे. जाहीर चौकात त्यांची कानउघडणी करून कान फोडले पाहिजेत. त्यांनी तातडीने जाहीर माफी मागावी.”
लक्ष्मण हाके यांची ‘सावध’ प्रतिक्रिया: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वाघमारे यांच्या विधानाचे समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले, मात्र त्यांनी थेट मनोज जरांगे यांच्या भाषेवरच बोट ठेवले. “नवनाथ आबांच्या विधानाचे मी समर्थन करत नाही, पण तुम्ही जरांगे यांची भाषा सहन करता ना? जरांगे लोकांच्या रंगावर, व्यंगावर, आईबापावर बोलतात. भुजबळांवर खालच्या भाषेत टीका करतात. ते तुम्ही सहन करता, मग आता नवनाथ आबा बोलले की तुम्हाला का वाईट वाटते?” असा सवाल हाके यांनी उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकरणावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले असून, सरकार आणि प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
OBC नेत्यांची गोंडस मुलं, पैसा पाहून मराठा मुली घरात घुसतात:नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट, ठिकठिकाणी निषेध

ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या तरुणींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि धक्कादायक विधान केले आहे. “ओबीसी नेत्यांची सुंदर मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या तरुणी त्यांच्या घरात घुसतात,” असे संतापजनक वक्तव्य वाघमारे यांनी केले आहे. या विधानानंतर राज्यभरात मोठा वाद पेटला असून, मराठा समाजातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. ठिकठिकाणी वाघमारे यांच्या विरोधात निदर्शने केली जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
मराठ्यांच्या लेकी-बाळींवर बोलाल, तर याद राखा!:मनोज जरांगेंचे वाघमारेंना प्रत्युत्तर; म्हणाले- सरकारला 58 लाख नोंदींची कुणबी प्रमाणपत्रे द्यावीच लागतील

“मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर वेळ आल्यास मराठे हे सरकार पाडतील. सरकारने मराठ्यांच्या 58 लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी (जात पडताळणी) द्यायलाच हवी. जर यातील एकही नोंद सरकारने कमी केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा थेट आणि अत्यंत आक्रमक इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांनी रुग्णालयातूनच पत्रकार परिषद घेत आपली पुढील रणनीती आणि सरकारवरील रोष व्यक्त केला. येथे वाचा संपूर्ण बातमी