Headlines

अंजनगाव अग्निशमन कर्मचाऱ्यांचा आजपासून कामबंद आंदोलन:ठेकेदारावर भ्रष्टाचाराचे आरोप, प्रशासनाकडे मागण्या प्रलंबित




अंजनगाव सुर्जी येथील नगरपरिषद अंतर्गत कार्यरत अग्निशमन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उद्या, मंगळवार, १ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ठेकेदाराकडून वेतनासह इतर बाबींमध्ये कथित अनियमितता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी ठेकेदारावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये कागदोपत्री कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून दाखवणे, कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अर्धा हिस्सा स्वतःकडे ठेवणे, कामावरून कमी करण्याची धमकी देणे, तसेच अनेक वर्षांपासून कोणतेही भत्ते व साप्ताहिक सुटी न देणे यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यापूर्वीही प्रशासनाकडे या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. वर्षभरापूर्वी, १६ सप्टेंबर २०२५ रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरपरिषदेकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ती माहिती देण्यात आलेली नाही. संबंधित ठेकेदारावरही कोणतीही कारवाई झाली नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या कथित निष्क्रिय भूमिकेमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता थेट उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, संबंधित ठेकेदाराचा कंत्राट तत्काळ रद्द करून प्रामाणिक कंत्राटदाराची नियुक्ती करावी, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांसाठी कामगार मंत्री, कामगार आयुक्त (अमरावती), पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविण्यात आली आहे. आशीष कोलाखरे, शेख कलाम, शेख गौस, विजय चापले, मयूर नायडकर, पवन सहारे, भूषण तायडे आणि गौरव थोरात यांनी हे निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास १ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *