![]()
अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात दीपज्योती संस्थेतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. अपर पोलीस महासंचालक सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि नागपूर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांच्या प्रेरणेने, तसेच कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांच्या आयोजनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ज्योत्स्ना शेटे आणि सदस्य सीमा नागरेचा, कामिनी खैरे, अनिता मसाने, बबिता राठोड यांनी अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर तुरुंग अधिकारी देवराव जाधव, ललित मुंडे आणि संजय घोलप यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. कारागृहातील बंदी बांधवांच्या रक्षाबंधनानिमित्त व्यक्त झालेल्या भावना संमिश्र आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या. एरवी गुन्हेगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तींमधील माणूस आणि हळवा भाऊ या दिवशी पूर्णपणे जागा झाला होता. कारागृहातील रक्षाबंधनाचे वातावरण आणि बंदींच्या मनात चाललेली घालमेल यानिमित्ताने सर्वांना अनुभवता आली. दीपज्योतीच्या संचालिका ज्योत्स्ना शेटे यांनी सांगितले की, राखी बांधून शुभेच्छा देताना त्यांचे डोळे पाणावले. आयुष्यात घडलेल्या एखाद्या चुकीच्या पावलामुळे आज आपण चार भिंतींच्या आड आहोत आणि आपल्या कुटुंबाला, विशेषतः बहिणीला याचा त्रास सहन करावा लागत आहे, याची तीव्र जाणीव बंदींना यावेळी झाली. बहीण भावाला रक्षक मानते, पण स्वतःच कैदेत असल्यामुळे आपण तिचे रक्षण करू शकत नाही किंवा तिच्या सुखात धावून जाऊ शकत नाही, हा पश्चात्ताप बंदींच्या चेहऱ्यावर पाहून त्यांचे मन हेलावून गेल्याचे शेटे यांनी नमूद केले. अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी सांगितले की, दीपज्योती संस्थेने घेतलेल्या रक्षाबंधन उपक्रमामुळे बंदी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी दीपज्योती संस्थेने महिला बंदींसाठी रक्षाबंधनानिमित्त जेवणाचे प्लेट्स भेट दिल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करून आभार मानले. यावेळी सुभेदार सुभाष राठोड, श्रीकृष्ण लांजेवार आणि दीपज्योतीचे सदस्य उपस्थित होते.
Source link
अमरावती मध्यवर्ती कारागृहात दीपज्योती संस्थेतर्फे रक्षाबंधन:बंदी बांधवांनी व्यक्त केल्या हृदयस्पर्शी भावना