Headlines

अमोल कोल्हेंची 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका बंद होणार?:नव्या मालिकेच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण




स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या प्रसारित होत असलेली “मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले” ही मालिका बंद पडणार का, असा सवाल आता प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. दररोज संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या वेळेत स्टार प्रवाहने नव्या मालिकेची घोषणा केल्याने सोशल मीडियासह प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत दिसत आहेत, तर अभिनेत्री मधुराणी गोखले सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहेत. अत्यंत अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. टीआरपीसोबतच सोशल मीडियावरही मालिकेची सातत्याने चर्चा होत होती. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या ऐतिहासिक घटनांमुळे काही विशिष्ट घटक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही मालिका बंद करण्यासाठी वाहिनीवर दबाव आणला जात असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही भूमिका समोर आलेली नसली तरी नव्या मालिकेच्या घोषणेनंतर चर्चांना अधिक वेग आला आहे. विशेष म्हणजे ही मालिका डॉ. अमोल कोल्हे यांच्या “जगदंब क्रिएशन्स” या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकांद्वारे इतिहास घराघरात पोहोचवण्यात या निर्मिती संस्थेला मोठे यश मिळाले होते. अभ्यासपूर्ण मांडणी आणि ऐतिहासिक संदर्भांमुळे त्या मालिकांना महाराष्ट्रभर मोठी लोकप्रियता लाभली होती. त्याच धर्तीवर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य, शिक्षण चळवळ आणि परिवर्तनाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने “मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले” ही मालिका सुरू करण्यात आली होती. मात्र आता नव्या मालिकेच्या घोषणेमुळे या मालिकेचे भवितव्य काय, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, मालिकेबाबत वाहिनी किंवा निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *