![]()
बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा – २०२६’ या राज्यस्तरीय महोत्सवाची अमरावती येथील प्राथमिक फेरी रविवारी, २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, गांधी चौक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीचा महोत्सव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित असणार आहे. या महोत्सवात विद्यार्थी एकपात्री, नाट्यछटा, स्वगत आणि नाटूकलेच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांचे शौर्य, पराक्रम, सामाजिक कार्य, शिक्षणप्रेम आणि लोककल्याणकारी कारभार यांचे सादरीकरण करणार आहेत. स्पर्धा वर्ग १ ते ५ वी, ६ ते १० वी तसेच समूह गट अशा तीन विभागांत होणार आहे.प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांना ९ ऑगस्टरोजी अहिल्यानगर येथे होणाऱ्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक गटातील उत्कृष्ट स्पर्धक आणि संघाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. ही स्पर्धा पूर्णतः निशुल्क असून अंतिम फेरीतील विजेत्यांना रोख पारितोषिके, पुस्तके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचा परिचय होण्याबरोबरच त्यांच्यात अभिनयकला, वक्तृत्व आणि सर्जनशीलतेचा विकास होण्यास मदत होणार आहे.अशी माहिती समन्वयक व मध्यवर्ती, मुंबईचे स्वीकृत सदस्य विशाल रमेश तराळ यांनी दिली. महोत्सवाच्या अधिक माहितीकरीता अध्यक्ष, अमरावती जिल्हा शाखा मंगेश बक्षी, सल्लागार संजिवनी पुरोहित, कोषाध्यक्ष स्वाती तराळ, अनुराग वानखडे यांच्याशी अधिक माहितीसाठी अमरावती जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Source link
अहिल्यादेवी यांच्या शौर्यावर स्पर्धा:इतिहास महाराष्ट्राचा-2026 अमरावती प्राथमिक फेरी 2 ऑगस्टला