![]()
चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड पडून 10 वर्षीय विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू आणि साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, या दोन धक्कादायक घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांनंतर विरोधकांनी पालिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, उपमहापौर संजय घाडी यांनी या बेजबाबदारपणासाठी थेट पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर मुख्यमंत्र्यांना टॅग करत आयुक्त अश्विनी भिडे यांचे समर्थन केले असून, या घटनांना जबाबदार असणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणामुळे मुंबई महानगरपालिका सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. याच पार्श्वभूमीवर, पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थिती आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेवरून पालिकेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. या सभेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली, ज्यामुळे मुंबईतील पावसाळी संकटाच्या मुद्द्यावरून पालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिकेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सभेचे आयोजन करण्यावरून विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. पावसाळी उपाययोजनांच्या चर्चेसाठी स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांच्यासह इतर चार सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापौर कार्यालयात वारंवार देऊनही त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या किशोरी पेडणेकर यांनी थेट महापौर कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देत चांगलेच सुनावले. यावेळी महापौर त्यांच्या दालनात उपस्थित नसल्यामुळे या दोघींची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. पेडणेकर आणि तावडे यांच्यात शाब्दिक चकमक या घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांना फोन करून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझ्या कार्यालयात येऊन अशा प्रकारे वागणे योग्य नाही,” अशी भूमिका महापौरांनी मांडली. यावर थेट उत्तर देताना पेडणेकर यांनी स्पष्ट केले की, “मी तुमच्या दालनात गेले नव्हते, तर बाहेरील कर्मचारी कार्यालयात गेले होते जे सर्वांसाठी खुले असते. तेथील कर्मचारी काम करत नसल्याने मी केवळ त्यांना जाब विचारला.” या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरच जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि हा वाद चव्हाट्यावर आला. विशेष सभा बोलावण्याची मागणी दरम्यान, प्रशासनावरील दबाव वाढवत स्थायी समिती सदस्य यशवंत किल्लेदार यांनीही महापालिका सचिवांना एक पत्र लिहून तातडीने विशेष सभा बोलावण्याची अधिकृत मागणी केली आहे. या पत्रावर टी. प्रभू, रमाकांत रहाटे, श्रद्धा जाधव आणि अशरफ आझमी या स्थायी समिती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रात अलीकडेच चेंबूर आणि साकीनाका येथे घडलेल्या दुर्दैवी घटनांचा विशेष उल्लेख करण्यात आला असून, पावसाळ्याच्या निमित्ताने महापालिकेने गांभीर्याने उपाययोजना कराव्यात याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
Source link
आजी-माजी महापौरांमध्ये शाब्दिक चकमक:किशोरी पेडणेकर थेट दालनात गेल्या, रितू तावडेंनी तात्काळ फोन केला; दोघी फोनवरच भिडल्या