![]()
पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रेत चंद्रभागा नदीपात्रात बुडणाऱ्या अकोला जिल्ह्यातील वारकऱ्यांना बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. हे पथक नदीपात्रात बोट व अन्य साहित्यासह सज्ज होते. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी आणि भाविक विठ्ठूराया व माता रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले. पहाटेपासूनच चंद्रभागा नदीत पवित्र स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. प्रशासनाकडून नदीपात्रात विशेष बचाव पथके व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. या सेवाकार्यात संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे दीपक सदाफळे व त्यांचे सहकारी नि:स्वार्थपणे कार्यरत होते. दरम्यान, सोमवारी सकाळी एक वारकरी नदीपात्रात उतरले. ते धारेतील भोवऱ्यात सापडले. हे दिसताच बंधाऱ्यावर हजर असलेले सोबतचे नातेवाईक अचानक आरडाओरडा करू लागले. ‘वाचवा, वाचवा’ ही नातेवाईकांची हाक ऐकून तैनात असलेल्या पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी थेट पुरात उडी घेतली. ते बुडणाऱ्या व्यक्तीकडे पोहत गेले. पथकातील सेवक नीलेश खंडारे यांनी त्या बुडणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने अचूक लाईफ रिंग फेकली. मात्र, पोहता येत नसल्यामुळे लाईफ रिंग पकडता येत नव्हती. तोपर्यंत दीपक सदाफळे त्या व्यक्तीजवळ पोहोचताच त्याला पकडले. त्यांनी त्याला सुरक्षित स्थळी घेऊन आले. या पथकामध्ये प्रशांत इंगळे, शाम घोंगे, विवेक गाडगे, शुभम भोपळे, प्रतिक गाडगे, प्रदीप सावंत, ज्ञानेश्वर म्हसाये, शरद महल्ले, हर्षल वानखडे, अमित जवके हे होते. शिवाजी दामोदर जायले असे या वारकऱ्याचे नाव आहे. पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने धाडसाने आणि क्षणाचाही विलंब न करता चंद्रभागेत उडी घेतली. नदीपात्रात लाईफ रींग फेकत दोन वारकऱ्यांचे प्राण वाचवले. केवळ सहा मिनिटात, ही मोहिम फत्ते झाली, असे जीवन रक्षक दीपक सदाफळे यांनी सांगितले. आषाढी वारीसाठी करीता सोलापूर जिल्हाधिकारी आदेशानुसार सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांचे नेतृत्वात सेवा सुरक्षा देण्यात आली.
Source link
आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले वारकऱ्यांचे प्राण:पंढरपूर येथे भक्तांच्या बचावासाठी सज्ज; बार्शीटाकळीतील पिंजर येथील सदस्यांची प्राणाची बाजी