![]()
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जंजीरा किल्ल्यावर सन्मानाने भगवा झेंडा लावावा. पुढील तीन महिन्यांत सरकारने ही मागणी पूर्ण न केल्यास केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. संस्थेच्या वतीने जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावल्यास त्याचे कायमस्वरूपी रक्षण आणि देखभाल करण्याची जबाबदारी घेण्यात येईल. यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डॉ. गोजमगुंडे यांनी दिली. यावेळी डॉ. गोजमगुंडे यांनी आणखी एका मागणीचा पुनरुच्चार केला. जंजीरा किल्ल्याप्रमाणेच पद्मदुर्ग किल्ल्यावरही सरकारने जेट्टी बांधावी, अशी मागणी संस्थेने मंत्री निलेश राणे यांच्याकडे केली आहे. यामुळे दळणवळण वाढून पर्यटनाला चालना मिळेल, असे देखील ते म्हणाले. संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष कुणाल साठे यांनी सांगितले की, 2016 मध्ये संस्थेने एकाच वेळी 300 किल्ल्यांवर भगवा झेंडा फडकवला होता. मात्र, जंजीरा किल्ल्यावर स्थानिक अल्पसंख्याक समाजाने त्यावेळी विरोध केला होता. तेव्हापासून संस्थेकडून या मागणीसाठी पत्रव्यवहार सुरू आहे. पुढील तीन महिन्यांत सरकारने जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा न लावल्यास, संस्थेच्या वतीने हजारो दुर्गप्रेमी एकत्र येऊन तेथे भगवा झेंडा फडकवतील. यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती कुणाल साठे यांनी दिली.
Source link
जंजीरा किल्ल्यावर तीन महिन्यांत भगवा फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन:सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा सरकारला इशारा