![]()
निवडणुकीत विजय-पराभव हा राजकारणाचा भाग असतो, मात्र निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पराभवानंतरही पाळणे हीच खरी माणुसकी आणि लोकसेवेची ओळख आहे. याचा प्रत्यय भराडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये आला असून जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही गणेश ढोरमारे यांनी प्रचारादरम्यान काटोन वस्तीतील शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ‘निवडणुकीचा निकाल काहीही असो, तुमचा रस्ता करून देणार,’ या एका वाक्याला त्यांनी कृतीची जोड देत वांगी फाटा ते काटोनवाडी वस्तीपर्यंतचा तब्बल १.५ किलोमीटर रस्ता स्वखर्चातून करून दिला आहे. जिल्हा परिषद निवडणूक २०२६ च्या प्रचारादरम्यान काटोनवाडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेची व्यथा गणेश ढोरमारे यांच्यासमोर मांडली होती. पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण होत होते. शेतीमालाची वाहतूक, बैलगाड्या, ट्रॅक्टर तसेच दैनंदिन ये-जा करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या वेळी गणेश ढोरमारे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले होते की, निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही तरी चालेल; मात्र तुमचा रस्ता नक्की करून देऊ. निवडणुकीचा निकाल लागला, विजय-पराभवाचे चित्र स्पष्ट झाले; मात्र दिलेला शब्द ढोरमारे यांच्या स्मरणातून गेला नाही. उलट निकालानंतरही त्यांनी आपल्या शब्दाची आठवण ठेवत रस्त्याचे काम स्वखर्चाने सुरू केले.
Source link
दीड किमीचा रस्ता स्वखर्चातून करून पाळले दिलेले वचन:पराभवानंतरही गणेश ढोरमारे यांनी बनवला रस्ता