![]()
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असून पावसाने पुन्हा एकदा ब्रेक घेतला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्या, तरी राज्यात कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आज, कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस हवामानात मोठा बदल होणार नसून, काही भागांत दमट तर काही ठिकाणी कोरडे हवामान राहील. धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित भागात हलक्या सरींची शक्यता असून सध्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. पुढील चार ते पाच दिवस हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा कोणताही अलर्ट नाही. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकत असल्या, तरी एकंदरीत हवामान उष्ण व कोरडे राहील. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. मराठवाडा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातील मोठ्या उघडीपीनंतर सप्टेंबरमध्येही अपेक्षित पाऊस न झाल्याने मराठवाड्यात पावसाची तूट वाढण्याची चिंता व्यक्त होत आहे. विदर्भ मागील दोन-तीन दिवसांतील चांगल्या पावसानंतर आता विदर्भातही जोर ओसरला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट नाही. पुढील चार-पाच दिवस काही भागांत ऊन-सावल्यांच्या खेळासह हवामान मुख्यत्वे कोरडे, दमट व उष्ण राहील. फुलंब्रीत 15 दिवसांनंतर रिमझिम पावसाची हजेरी गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी फुलंब्री तालुक्यात रिमझिम हजेरी लावली. या पावसामुळे उन्हामुळे कोमेजणाऱ्या बागायती पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले असले, तरी तुटपुंज्या पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. दीर्घ खंडामुळे तालुक्यातील कोरडवाहू भागातील कपाशी, सोयाबीन आणि मक्याची पिके उन्हाच्या तीव्रतेने पार जळून गेली आहेत. हा रिमझिम पाऊस बागायती पिके व विहिरींसाठी तात्पुरता दिलासा ठरणार असला, तरी कोरडवाहू पिके हातातून पूर्णपणे निघून गेली आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला असून,प्रशासनाने पिकांचे तातडीने पंचनामेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. पावसासाठी जालन्याच्या तीर्थपुरीत मुस्लिमबांधवांचे अल्लाकडे साकडे यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्ट हे तीन महत्त्वाचे महिने अपेक्षित पावसाविना गेल्याने जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी आणि परिसरात दुष्काळ सदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेती संकटात सापडली असून विहिरी,नदी-नाले आणि अन्य जलस्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि पावसासाठी अल्लाकडे रहमतीची याचना करण्यासाठी तीर्थपुरीतील मुस्लिम समाजाच्या वतीने विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. दुष्काळ जाहीर करा, बीडमध्ये किसानसभा, युनियनकडून आंदोलन पाऊस न पडल्यामुळे बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूरयुनियन या संघटनेच्या वतीने शिवाजीकुरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार रोजी माजलगाव तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. बीड जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यातील ऊस, सोयाबीन, कापूस व इतर पिके पाऊस न पडल्यामुळे धोक्यात आलेली आहेत.
Source link
महाराष्ट्रात पावसाची उघडीप कायम:पुढील चार दिवस कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट नाही, कोकणात हलक्या सरी बरसण्याचा अंदाज