![]()
गतवर्षी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील राहुलनगर (सुलतानपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाण्याने वेढा दिला होता. जवळपास १५ दिवस शाळा पाण्याखाली होती. शाळेत पाणी साचून राहिल्याने भिंतींना भेगा पडल्या आहेत. शाळा धोकादायक स्थितीत आहे. शाळेत ३५ चिमुकले भीतीच्या सावटाखाली ज्ञानार्जन करत आहेत. भविष्यातील धोका टाळण्यासाठी वर्ग खोल्यांची डागडुजी करावी. नूतनीकरण करावे आणि वॉल कंपाउंड बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावात ही जिल्हा परिषदेची एकमेव शाळा आहे. दोन खोल्या व एक किचन असणारी ही शाळा आहे. जवळपास ४ किलोमीटर अंतरापर्यंत दुसरी शाळा नाही. महापुरात शाळा १५ दिवस पाण्याखाली राहिल्यामुळे शाळेचा पाया खचला आहे. शैक्षणिक साहित्य खराब झाल्याने फेकून द्यावे लागले आहे. भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून, फरशा खचल्याने वर्गात बेंचही व्यवस्थित बसत नाहीत. शौचालयाची दुरवस्था झाली असून, शोषखड्डे बुजले आहेत. पावसाळ्यात पुराचे पाणी थेट शाळेत शिरू नये यासाठी वॉल कंपाउंड बांधणे आवश्यक आहे. ^महापुरामध्ये ही शाळा पंधरा दिवस पाण्याखाली असल्याने पाया खचला असून, भिंतींना तडे गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका संभवत आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही मागणी करत आहोत. परंतु अद्यापपर्यंत हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. हणुमंत धुमाळ, तंटामुक्त अध्यक्ष ^शाळेसाठी नवीन खोल्या व वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून, एक-दोन दिवसांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. नूतन इमारतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. रामदास बारबोले, मुख्याध्यापक, जि.प.प्रा. शाळा, राहुलनगर
Source link
राहुलनगर शाळेच्या भिंतीला भेगा पडल्या:गतवर्षीच्या पुरामुळे नुकसान, विद्यार्थी भीतीखाली