Headlines

लष्कराने गडचिरोलीत 1500 विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन केले:दुर्गम भागातील तरुणांना 'अग्निवीर' योजनेची दिली माहिती




भारतीय लष्कराच्या नागपूर येथील आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसने गडचिरोली जिल्ह्यात एक विशेष मार्गदर्शन उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना भारतीय लष्करातील करिअर संधी आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नागपूर आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती सत्रे आयोजित केली होती. स्थानिक तरुणांना लष्कराच्या भरती प्रक्रियेतील विविध टप्पे समजावून सांगणे हा या सत्रांचा मुख्य उद्देश होता. गडचिरोली जिल्हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम मानला जातो. येथील तरुणांमध्ये क्षमता असूनही, योग्य माहितीच्या अभावामुळे ते अनेकदा मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लष्कराने हा पुढाकार घेतला. ‘अग्निवीर’ योजनेची माहिती देऊन त्यांना सन्मानजनक रोजगार आणि सुरक्षित भविष्याची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता. या मार्गदर्शन सत्रांमध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेचे विविध टप्पे सोप्या भाषेत स्पष्ट केले. यात शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीसाठी तयारी कशी करावी, यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. केवळ नोकरी नव्हे, तर देशाच्या संरक्षणासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे गडचिरोलीतील तरुण पिढीला भारतीय लष्करासारख्या प्रतिष्ठित सेवेत करिअर करण्याची नवी दिशा मिळाली आहे. लष्कराच्या या प्रयत्नांचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, यामुळे तरुणांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *