![]()
झाड आणि रस्ता यांचे नाते नेहमीच विळ्या-भोपळ्याचे राहिले आहे. अरुंद रस्ता, वाढती वाहतूक आणि अपघातांचे सत्र यामुळे श्रीरामपूर-बेलापूर राज्य मार्ग क्रमांक ३६ या ६ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करणे आवश्यक होते. मात्र, हा विकास साधताना वडाच्या झाडांसह इतर शेकडो जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली. वृक्षप्रेमींच्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाने रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकांमध्ये नवीन झाडे लावली , मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रखरखत्या उन्हात लाखो रुपये खर्चून लावलेल्या झाडांची ‘राखरांगोळी’ झाली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. रस्ता रुंदीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणात पर्यावरण रक्षणाचे महत्त्व वाढले आहे. पर्यावरण आणि विकास हे परस्परांना विरोधी नसून पूरक आहेत. मात्र, झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्यांवर ‘विकासविरोधी’ असा शिक्का मारला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपणाच्या मोहिमांचे पीक येते, पण त्यात ‘चमकोगिरी’ जास्त आणि संवर्धन कमी, अशीच काहीशी स्थिती येथे पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दुभाजकावर झाडे लावण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे, समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटचा प्रखर झोत या झाडांमुळे कापला जातो, ज्यामुळे अपघात टळतात. तसेच वाहनांचा धूर आणि धूळ शोषून घेण्याचे काम ही झाडे करतात. मात्र, या रस्त्यावर लावलेली झाडे पाण्याअभावी जळून खाक झाली आहेत. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात प्रशासनाने नक्की किती झाडे लावली आणि किती जगवली? याचे उत्तर आज कोणाकडेही नाही. स्त्याचे काम पूर्ण झाल्यावर दुतर्फा व दुभाजकावर झाडे लावण्यात आली, मात्र त्यांना पाणी घालून जगवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? पाण्याअभावी लाखो रुपयांची रोपे जळून खाक झाल्याने शासनाचा पैसा पाण्यात गेला आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल वृक्षप्रेमी कर त आहेत. दुप्पट झाडे लावण्याचे आश्वासन हवेतच अमित मुथा यांच्यासह अनेक वृक्षप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते. त्यावर मे २०२१ मध्ये विभागाने लेखी पत्र देऊन अत्यावश्यक झाडेच काढली जातील, मोठी झाडे वाचवू आणि जेवढी झाडे तोडू त्याच्या दुप्पट लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत या आश्वासनाची कोणतीही प्रामाणिक अंमलबजावणी झालेली नाही. पूर्वी या महामार्गावरून प्रवास करताना वडाच्या झाडांची दाट सावली मिळायची. भौतिक विकासाच्या नावाखाली निसर्गाकडे डोळेझाक झाल्याने आता झाडांची जागा गाड्यांमधील वातानुकूलित यंत्रणेने घेतली आहे. आता नागरिकांनीच लोकचळवळ उभारण्याची गरज आहे.
Source link
श्रीरामपूर-बेलापूर नव्या रस्त्यासाठी झाडांचा बळी:वृक्षप्रेमींमध्ये संताप, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन रोपांचीही राखरांगोळी