Headlines

सरकारकडून मराठवाड्याला अन्यायकारक वागणूक:विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांचा आरोप, छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन




छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होणारी मंत्री मंडळाची बैठक यावर्षीही होणार नाही यावरून सरकारला मराठवाड्याच्या विकासासाठी काहीही देणेघेणे राहिलेले नाही हे स्पष्ट होत असून शासनाकडून मराठवाड्याला अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे यांनी शनिवारी ता. १३ दिव्य मराठीशी बोलतांना केला आहे. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दानवे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे, वसीम देशमुख, दिलीप घुगे, रेणुका पतंगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर त्यांनी प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी दिव्य मराठशी बोलतांना दानवे म्हणाले की, सरकारला मराठवाड्याच्या विकासाचे काही देणे घेणे उरलेले नाही. मराठवाड्यावर सातत्याने अन्यायकारण वागणुक दिली जात असून मराठवाड्यातील जनतेवर अन्याय केला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे यापुर्वी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत सरकारने मराठवाड्याच्या विकासाठी सुमारे ५६ हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मात्र हि घोषणा कागदावरच राहिली असून त्यातून केवळ ३३०० कोटी रुपये मिळाले आहे मात्र हा निधी देखील अखर्चितच आहेत. सरकार मराठवाड्याचा विकास करू इच्छीत नाही दुर्देवाने सत्ताधारी पक्षाचे लोक झोपलेले असल्याचा आरोपही दानवे यांनी यावेळी केला. शासनाने मराठवाड्यातील सिंचनाच्या प्रकल्पाची घोषणा केली मात्र या प्रकल्पाचे अद्याप सर्वेक्षणच झालेले नाही. नदीजोड प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र त्याचेही सर्वेक्षणच अद्यापही झाले नाही. सिंचनाचे प्रकल्प न झाल्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या खाईत असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाने घोषणा कमी अन काम जास्त केले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी गाजावाजा करून हाती घेतलेली पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना फसवी असून आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा झाले याची आकडेवारी शासनाने जाहिर करावी. मराठवाड्यात आता पर्यंत बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातुर या भागात भेटी दिल्या असून त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असतांना एकही मंत्री पाहणीसाठी येत नाही हे दुर्देव असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यात पावसा अभावी पिके नष्ट झाली असून मराठवाड्यात दुष्काळ जाहिर झाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्‍नावर तसेच दुष्काळी परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ता. १७ सप्टेंबर रोजी मोठे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात मराठवाड्यातून शेतकऱ्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *