![]()
सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायी घटना फलटण तालुक्यातून समोर आली आहे. तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे विजेचा जोरदार धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील तब्बल चार सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. डोळ्यांदेखत आपल्या माणसाला तडफडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर तिघांनाही या जीवघेण्या विजेच्या प्रवाहाने आपल्या कवेत घेतले. एका क्षणात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पहाटेच्या वेळी घडला अनर्थ मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव गावातील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ शिंदे कुटुंब वास्तव्यास होते. बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास किसन शिंदे हे घराबाहेर आले होते. त्यावेळी घराबाहेर असलेल्या एका विद्युत वायरमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरला होता. किसन शिंदे यांचा या जिवंत वायरला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा अत्यंत जोरदार धक्का बसला. एकमेकांना वाचवताना गेला सर्वांचा जीव किसन शिंदे यांना विजेचा धक्का लागल्याचे पाहून घरातील इतर सदस्य मोठ्या भीतीने त्यांना वाचवण्यासाठी धावले. गंगुबाई शिंदे, सचिन शिंदे आणि आरती शिंदे यांनी किसन यांना विद्युत प्रवाहातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने ते तिघेही या शक्तिशाली विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले. हा शॉक इतका भयंकर होता की, या चौघांचाही जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या धडपडीत संपूर्ण कुटुंबानेच जीव गमावल्याने या घटनेने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. पोलिसांची घटनास्थळी धाव अन् पंचनामा या भयंकर दुर्घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. एकाच घरातून चार मृतदेह बाहेर पडल्याने परिसरातील वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते. महावितरणचा निष्काळजीपणा? पोलिसांचा तपास सुरू घराबाहेरील वायरमध्ये अचानक जीवघेणा विद्युत प्रवाह कसा आला? ही घटना एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे घडली की यामागे महावितरणचा गंभीर निष्काळजीपणा आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, याचा सखोल तपास आता फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. मात्र, या दुर्घटनेमुळे मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा.. राज्यात पावसाचा धुमाकूळ:पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यावर हायअलर्ट; मुंबई, नाशकात जोर ओसरला, वाचा तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय? राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. संपूर्ण जून महिन्याची पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघाली आहे. एकीकडे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळून मुंबईला पावसापासून थोडा दिलासा मिळाला असला, तरी पुण्यात मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावर आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सविस्तर वाचा..
Source link
साताऱ्यात मन सुन्न करणारी दुर्घटना:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अख्खं कुटुंब संपलं; विजेच्या धक्क्याने 4 जणांचा जागीच मृत्यू