Headlines

37 वर्षांनंतरही आनंद दिघेंचा वारसा कायम – एकनाथ शिंदे:देखावे-रोषणाईपलीकडे गणेशोत्सवातून समाजप्रबोधन करा




गणेशोत्सव हा केवळ देखावे, आकर्षक आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली गेली पाहिजे. हाच उद्देश धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात गणेश दर्शन स्पर्धा सुरू करताना ठेवला होता. त्यांच्या या विचारांची आणि परंपरेची गेल्या ३७ वर्षांपासून कार्यकर्त्यांकडून सातत्याने जपणूक केली जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यातील गणेश दर्शन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांचा यावेळी गौरव करण्यात आला. आनंद दिघे यांनी गणेशोत्सवाबरोबरच दहीहंडी आणि नवरात्रोत्सवासारख्या उत्सवांनाही सामाजिक कार्याची जोड दिली. गणेश मंडळांना भेटी देताना ते केवळ सजावट आणि देखावा पाहत नसत, तर मंडळाने कोणता विषय मांडला आहे, आरास कशी केली आहे, त्यासाठी किती खर्च झाला आहे, याचीही माहिती घेत असत. विशेष म्हणजे सजावटीसाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वतः मेहनत घेतली आहे का, यालाही ते महत्त्व देत असत, अशी आठवण शिंदे यांनी यावेळी सांगितली. उत्सवातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे काम केले. त्याच परंपरेला पुढे नेत आज अनेक गणेश मंडळे सामाजिक आणि जनजागृतीचे विषय आपल्या देखाव्यांमधून मांडत आहेत. पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती, सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांवर देखावे साकारले जात आहेत. गणेश मंडळांकडून केवळ उत्सव साजरा केला जात नाही, तर आरोग्य शिबिरे, रक्तदान, रुग्णवाहिका सेवा, गरजू नागरिकांना मदत आणि संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाण्यासारखी कामेही केली जातात. त्यामुळे गणेश मंडळे ही सामाजिक भान जपणारी केंद्रे बनत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. उत्सव साजरे करण्यासाठी नियमांमध्ये सुलभता मुख्यमंत्री असताना सण-उत्सवांवरील अनेक निर्बंध दूर करण्याचा प्रयत्न केला. गणेश मंडळांना उत्सव साजरा करताना परवानग्या मिळण्यात अडचणी येऊ नयेत तसेच मंडप शुल्काबाबतही सुलभता निर्माण व्हावी, यासाठी निर्णय घेण्यात आले. आपली संस्कृती आणि परंपरा नागरिकांना उत्साहाने साजरी करता यावी, हा त्यामागील उद्देश होता, असे शिंदे म्हणाले. आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेली दहीहंडीची परंपरा पुढे महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचली. कोणतेही मोठे सत्तेचे पद नसतानाही दिघे यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना जनतेत मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आजही कार्यकर्ते पुढे नेत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. तरुणांच्या कलागुणांना व्यासपीठ गणेश दर्शन स्पर्धेमुळे गणेश मंडळांमधील तरुण कार्यकर्त्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळते. मंडळांचे नियोजन, देखावे तयार करणे, सजावट, व्यवस्थापन यामुळे तरुणांच्या विविध कौशल्यांना वाव मिळतो. आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, कला आणि इतर क्षेत्रांतील कौशल्यांचा उपयोग गणेशोत्सवाच्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे अशा मंडळांना आणि तरुणांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पुढील वर्षी अधिक चांगली तयारी करण्याचे आवाहन गणेश दर्शन स्पर्धेत पारितोषिक मिळवलेल्या सर्व मंडळांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले. यंदा पुरस्कार मिळाला नाही म्हणून इतर मंडळांनी निराश होऊ नये. जिद्द आणि चिकाटी कायम ठेवून पुढील वर्षी अधिक चांगली तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना कोणताही त्रास किंवा गैरसोय होणार नाही, याचीही मंडळांनी काळजी घ्यावी. उत्सवाचा आनंद घेत असताना संस्कृती आणि परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक सलोखाही कायम ठेवला पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, अभिनेता अजिंक्य देव, प्रा. प्रदीप ढवळ, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक अनिल भोर यांच्यासह शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेही वाचा.. MPSC पेपरफुटी:’…तर एक क्षणही पदावर राहणार नाही’, आरोपांनंतर MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे थेट आव्हान नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच एमपीएससीच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर राज्यात विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. आज पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मोर्चा काढला. सरकारसह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर देखील आरोप करण्यात आले. त्यावर आता भीमनवार यांनी निवेदन देत त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *