![]()
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे ‘अजित-५’ हे वाण शेतकऱ्यांना न मिळाल्याचे पडसाद सोमवारच्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत उमटले. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. शिवसेनेचे (उबाठा) आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण व भाजपचे हरिश पिंपळे यांनी बियाण्यांवरून प्रश्नांची सरबत्ती केली. शेतकऱ्यांना हवे असलेले बियाणे कृषी सेवा केंद्रात न मिळता मागील बाजूने काळ्या बाजारात विक्री होत आहे, असा आरोप आमदारांनी केला. यावर बियाण्यांचा काळा बाजार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. काळा बाजार आढळल्यास कठोर कारवाई होईल, असा आदेश पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी दिला. शेतकऱ्यांना हवे असलेले बियाणे मिळत नसल्याने त्यांना नाइलाजास्तव अन्य बियाणे घ्यावे लागत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने रविवारी प्रकाशित केले होते. बैठकीत आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिश पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, आ. साजिद पठाण, आ. किरण सरनाईक, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे उपस्थित होते. खरीपासाठी ४ लाख ३७ हजार १०० हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. कापसाचे संभाव्य क्षेत्रफळ १ लाख ४५ हजार हेक्टर आहे. या क्षेत्रफळासाठी ७ लाख २५ हजार पाकिटांची मागणी आहे. उर्वरित पान ४ शनिवारी अकोला तालुक्यातील शेतकरी बियाणे घेण्यासाठी आले होते. मात्र त्यांना हवे असलेले बियाणे मिळाले नाही. काहींना नाइलाजास्तव अन्य बियाणे घ्यावे लागले. याच ठिकाणावरून शेतकऱ्यांनी आ. नितीन देशमुख व आ. साजिद खान पठाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ही बाब दोन्ही आमदारांपर्यंत पोहोचली. त्यांनी खरिपाच्या आढावा बैठकीत जाब विचारण्याची ग्वाही दिली. अखेर सोमवारच्या बैठकीत आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला. याच वेळी आ. देशमुख यांनी आ. रणधीर सावरकर यांना तुमच्याच मतदारसंघातील शेतकरी होते, अशी माहिती दिली. एकूणच यंदाच्या खरीप हंगामात कृषी निविष्ठांच्या पुरवठ्यावरून राजकीय वातावरण तापण्याचे संकेत बैठकीत मिळाले. कृषी विभागाकडून वेळोवेळी होणाऱ्या कार्यवाहींची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. वॉररूमचा वापर व्हावा. आपत्तीप्रसंगी पंचनामे करताना ते परिपूर्ण होतील. कुणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ‘महावितरण’कडून डीपी संच मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध ठेवावेत, असेही ते म्हणाले. बियाण्यांवरून राजकीय रस्सीखेच शेतकऱ्यांना भरपाई द्या ‘अजित-५’ हे कपाशीचे बियाणे पहिल्याच दिवशी कसे संपले, असा सवाल आ. देशमुख यांनी केला. यावर कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३४२२० पाकिटे आली होती. १४ मे रोजी २७४८० पाकिटे आली. उर्वरित पाकिटे रविवारी प्राप्त झाली. संपूर्ण साठा वितरित झाला. एवढी पाकिटे एकाच दिवशी कशी विक्री झाली, असा सवाल आ. देशमुखांनी केली.
Source link
शेतकऱ्यांना पसंतीचे बियाणे मिळत नसल्याने आमदारांची प्रश्नांची सरबत्ती:लाेकप्रतिनिधींशी चर्चा करून खरिपाचे पुनर्नियोजन हाेणार