पावसाळी अधिवेशनात पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ला पडलेले खड्डे आणि पावसातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर बोलताना काल (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून “भाडे के ट
.
संजय राऊत: “महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला. राऊत म्हणाले, “वैफल्य, अहंकार, माज वैगरे वैगरे… हे सर्व क्षणात उतरेल! महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे! पण काय करणार? खाण तशी माती!” “देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय? सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार, झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे!” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
यशोमती ठाकूर: “बिनकामाचं सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही”
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा समाचार घेताना म्हटले की, ज्यांनी आयुष्यभर भाडोत्री लोक वापरून दुसऱ्यांवर टीका केली, त्यांना आज स्वतःवर होणारी उत्स्फूर्त टीकाही भाडोत्री वाटते. “लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही नुकतेच सरकारला फटकारले आहे. मोठ्या पदावर बसलेल्या नेत्यांनी जनतेच्या टीकेला खेळाडूवृत्तीने घेऊन कामात सुधारणा करायची असते. विधानभवनातून अशा धमक्या द्यायच्या नसतात.” बॉडी लँग्वेज सांगत आहे, मिसिंग लिंकचा दणका जोरात बसलाय! हे ‘बिनकामाचं सरकार’ म्हणजे महाराष्ट्र नाही… आणि फडणवीस म्हणजे महाराष्ट्र तर अजिबातच नाही,” असा टोला ठाकूर यांनी लगावला.
विजय वडेट्टीवार: “विरोधकांनी प्रश्न मांडणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी नव्हे”
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संविधानात्मक चौकटीची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “महाराष्ट्र हा 14 कोटी जनतेचा स्वाभिमानी प्रदेश आहे. रस्ते, भ्रष्टाचार, विकासातील उणिवा किंवा जनतेचे प्रश्न मांडणे ही विरोधी पक्षाची घटनात्मक भूमिका आहे. विरोधकांनी जनहिताचे प्रश्न मांडणे म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी नव्हे.” “मुख्यमंत्र्यांनी टीका वैयक्तिक न घेता जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे,” असे आवाहन त्यांनी केले.
अंजली दमानिया: “कालचे फडणवीस आज ‘देख लुंगा’ म्हणतात”
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांच्या अहंकारावर बोट ठेवले. “फक्त आणि फक्त अहंकार… मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना, सगळ्यांना ‘भाडे के टट्टू’ म्हणणं एका मुख्यमंत्र्यांना शोभतं का?” “प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अफाट भ्रष्टाचार होत असताना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देख लुंगा’? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे आणि आज असे बोलत आहेत,” अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब थोरात: “हुकूमशाहीकडे वाटचाल”
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पावसाळी अधिवेशनातील कामकाजावर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. अध्यक्षांची भूमिका: विधानसभेचे आणि विधान परिषदेचे अध्यक्ष आता सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. लोकशाहीत समर्थ विरोधी पक्ष असणे महत्त्वाचे असते. पुण्यात मेट्रो स्टेशनमध्ये पूर आल्यावर तिथे पत्रकारांना छायाचित्रण करण्यास बंदी घालण्यात आली. यावर बोलताना थोरात म्हणाले, “आपण हुकूमशाहीकडे चाललो आहोत. जगात माध्यम स्वातंत्र्यात भारताचा क्रमांक 156वा आहे, ही चांगली गोष्ट नाही. प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित असला पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी त्याची उत्तरे देण्याची तयारी ठेवली पाहिजे.”
काल काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून सातत्याने टीका करणाऱ्यांना लक्ष्य केले होते. “काही लोक तोंडखुरी करत आहेत. 18 तासांत वाहतूक सुरू झाली, तरी जणू सात हजार कोटी रुपये पाण्यात गेले, असा प्रचार केला जात आहे. मला शिव्या द्या, मी शिव्याप्रूफ आहे; पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजपासून दहा वर्षांनी शिव्या देणारे दिसणार नाहीत, पण ही कनेक्टिंग लिंक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाने ओळखली जाईल,” असे ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे.
संबंधित बातमी वाचा…
मिसिंग लिंकवरून विरोधकांना फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर:म्हणाले- मला बदनामा करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका; 13 हजार कोटींचा पूर नियंत्रण आराखडा

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अतिवृष्टी, पूरस्थिती, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर विधानसभेत नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा मांडला. यावेळी त्यांनी मुंबईत अवघ्या सहा दिवसांत पावसाळ्यातील सुमारे 42 टक्के पाऊस झाल्याचे सांगत हा अपवादात्मक पाऊस असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मुंबईची तुंबई रोखण्यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार केल्याची माहिती दिली. मिसिंग लिंक प्रकल्पावरील टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आघाडी सरकारने हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगून फाइल बंद केली होती, तर महायुती सरकारने तो प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवल्याचा दावा केला. येथे वाचा संपूर्ण बातमी