![]()
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नागपूरसह राज्यभरातील १५० हून जास्त ठिकाणांवर छापे टाकले. पाकिस्तानात बसून भारतीय तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी चिथावणी देणारा आयएसआयचा हस्तक शहजाद भट्टीच्या राज्यातील नेटवर्कविरोधात ही कारवाई होती. या मोहिमेत एटीएसने सोशल मीडियावरून भट्टीच्या संपर्कात असलेल्या १७५ संशयितांना शोधून काढले असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. एटीएसच्या १४ प्रादेशिक विभागातील ५८ पथकांनी राज्यभरात शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून एकाच वेळी ही मोहीम राबवली. बंदी घातलेल्या मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून भट्टीच्या संपर्कात आलेल्या या तरुणांचा शोध एटीएसने घेतला आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांचे सध्याचे लोकेशन, त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्या हालचाली तपासल्या जात आहेत. चौकशीनंतर अनेकांना सोडून दिले. तरुण पिढीचे ब्रेनवॉश करून त्यांना देशविघातक कृत्यांकडे वळवण्याचा भट्टी नेटवर्कचा डाव या कारवाईमुळे उधळला आहे. मराठवाड्यातील १५ जणांची चौकशी; नाशिक, पुण्यातही छापे एटीएसने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १० संशयितांची (वैजापूर २, मिसारवाडी ३, हर्सूल १, आरिफ कॉलनी १, बायजीपुरा १ व गंगापूर येथील १ परप्रांतीय मजूर व अन्य भागातील १ जण) चौकशी केली. तर जालन्यातील २, धाराशिवमधील २, बीडमधील एकाला ताब्यात घेतले. धुळ्यातून ३, जळगाव ६, अहिल्यानगर ७, मालेगाव व नाशिकमधून प्रत्येकी ४, नागपूर ४, चंद्रपूर ३, गोंदिया, गडचिरोली, वर्ध्यात प्रत्येकी १ संशयित ताब्यात घेतला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सांगली व सातारा येथही छापे टाकले होते. दिल्लीतील हल्ल्याच्या कटातून महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस दिल्ली पोलिसांनी बुधवारी पंजाब व दिल्लीतून भट्टीच्या ६ दहशतवादी हस्तकांना अटक केली. त्यांनी दिल्लीत अनेक ठिकाणी पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट रचल्याचे कबूल केले. यासाठी दानिश ऊर्फ चांद मियाँ याला २० हजारांचे आमिष दिले होते. त्याचा साथीदार सलमानवर हल्ल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड पाकिस्तानात पाठवणार होता. या मॉड्यूलच्या तपासातून भट्टीचे नेटवर्क महाराष्ट्रातही सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले.
Source link
शहजाद भट्टी नेटवर्कविरुद्ध 150 ठिकाणी छापे:संभाजीनगरसह राज्यभरात 175 संशयितांची एटीएसकडून चौकशी