![]()
आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, सेवा व समतेचा संदेश देणारा सण आहे. संत सावता माळी, संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांची शिकवण आपल्याला परिश्रम व समाजसेवेची प्रेरणा देते. महापालिकेच्या वतीने शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे जतन केले जाईल, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा येथील श्री संत सावता महाराज व विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा-तुकाराम” च्या अखंड नामगजरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. आकर्षक फुलांची सजावट, रांगोळ्या आणि दीपसजावटीमुळे मंदिर परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी महापौर ज्योती गाडे व महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या शुभहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा झाली. या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, खजिनदार पांडुरंग नन्नवरे यांच्यासह सर्व विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते. महापूजेनंतर देवस्थानतर्फे महापौर आणि आयुक्तांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दिवसभर अभिषेक, आरती, हरिपाठ, अभंगगायन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर अभिषेक, आरती आणि शिस्तबद्ध महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिपाठाच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले होते. प्रास्ताविक सचिव अशोकराव कानडे यांनी केले. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग दिवसभर मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि बालकांनी मोठ्या श्रद्धेने विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. वारकरी साप्रदायातील टाळ-मृदुंगाच्या गजरात अभंग आणि हरिपाठाचे सादरीकरण करण्यात आले. संपूर्ण वातावरण विठ्ठलनामाच्या अखंड गजराने भारावून गेले होते. भाविकांनी “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल”च्या जयघोषात भक्तीचा आनंद अनुभवला. मंदिर प्रशासन, विश्वस्त मंडळ, स्वयंसेवक आणि भाविक यांच्या संयुक्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि यशस्वी वातावरणात पार पडला. उपस्थितांनी संत सावता माळी महाराजांच्या कार्याचे स्मरण करत विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना केली आणि समाजात सद्भावना, सेवा, स्वच्छता व संतांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला
Source link
आषाढी हा सामाजिक ऐक्य, सेवा, समतेचा संदेश देणारा सण- महापौर:माळीवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विठू नामाने दुमदुमला