![]()
युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे. आजचे युवक-युवती हेच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. प्रामाणिकपणा, त्याग आणि राष्ट्रसेवेची जिद्द अंगी बाळगून काम केल्यास देश निश्चितच प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, असा प्रेरणादायी संदेश ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध राज्यांतील आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिला. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २० आयपीएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास आणि पाणलोट क्षेत्र विकासाचा अभ्यास करण्यासाठी राळेगणसिद्धीला भेट दिली. यावेळी अण्णा हजारे व जिल्हा पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हजारे यांनी राळेगणसिद्धीच्या दुष्काळग्रस्त गावापासून आदर्श गावापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेत जलसंधारण, ग्रामविकास, लोकसहभाग आणि सामूहिक श्रमातून घडलेले परिवर्तन उलगडून सांगितले. तसेच २०११ च्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनातील अनुभवही त्यांनी कथन केले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी प्रशासनातील पारदर्शकता, नेतृत्व आणि लोकसहभाग याबाबत अण्णा हजारेंशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, ज्योती गडकरी, सोमनाथ दिवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. देशसेवेसाठी ‘हे’ पाच गुण आवश्यक शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्यागाची भावना आणि अपमान सहन करण्याची ताकद हे पाच गुण ज्याच्या अंगी असतात, तोच समाज आणि देशासाठी प्रभावीपणे काम करू शकतो. प्रत्येक अधिकाऱ्याने पदाचा वापर अधिकार गाजविण्यासाठी नव्हे, तर समाजहितासाठी करावा,” असे आवाहन हजारे यांनी यावेळी केले.
Source link
आयपीएस प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन:युवा शक्तीच राष्ट्रशक्ती- हजारे, जलसंधारण आणि पारदर्शक प्रशासनाचे दिले धडे