Headlines

डेटा केबल्सच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे- माजी नौदल प्रमुख:भारताने अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस धोरण सक्षम करावे




माजी नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी भारताला पाण्याखालील क्षेत्राविषयीची जागरूकता (अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस – UDA) तातडीने अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. समुद्रातून जाणाऱ्या संप्रेषण केबल्सचा जागतिक इंटरनेट वाहतुकीत वाढता वाटा लक्षात घेता, महत्त्वपूर्ण सागरी पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी समुद्रतळावरील युद्धतंत्राची क्षमता विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. अॅडमिरल सिंह यांनी सांगितले की, सध्या समुद्रातून जाणाऱ्या केबल्सचा वापर ८० ते ९० टक्क्यांपर्यंत होत आहे आणि भविष्यात त्याची मागणी वाढणार आहे. एखादी केबल तुटल्यास किंवा निष्क्रिय झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे सांगत त्यांनी भारताच्या समुद्राखालील नेटवर्कसमोरील वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले. ते पुणे येथे मरिटाइम रिसर्च सेंटर आणि नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेयर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अॅडव्हान्सिग अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस फ्रेमवर्क फॉर इंडियाज महासागर व्हिजन अँड इट्स रीअलायझेशन’ या कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुलगावकर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) कमांडंट व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी, मरिटाइम रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. (कमांडर) अर्णब दास आणि इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेयर्सचे अरुद्र सिंह उपस्थित होते. सिंह यांनी पाण्याखालील केबल्सचे संरक्षण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोरणात्मक प्राधान्याचा विषय असल्याचे अधोरेखित केले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनेही या केबल्सना महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट केले आहे, असे त्यांनी सांगितले. फ्रान्स आणि ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या अनुभवातून धडे घेऊन भारताने समुद्रतळावरील युद्धतंत्र विकसित करण्यासाठी सक्रिय प्रयत्न करावेत, असे त्यांनी सुचवले. या संदर्भात आंतरराष्ट्रीय सहकार्याला पाठबळ देण्याचे आवाहनही त्यांनी केले. हिंद महासागर क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण आव्हानांचा सामना करण्यासाठी नौदलाच्या दृष्टिकोनात व्यापक अंडरवॉटर डोमेन अवेअरनेसचा समावेश करणे आवश्यक असल्याचे अॅडमिरल सिंह यांनी नमूद केले. असुरक्षित समुद्री मार्गिका, चोक पॉइंट्समधून केंद्रीत प्रवेश-निर्गमन मार्ग आणि मोठ्या प्रमाणावर उथळ समुद्रप्रदेश यामुळे सोनार व माइन वॉरफेअरच्या दृष्टीने अनेक गुंतागुंतीची आव्हाने निर्माण होतात, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) कमांडंट व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी यांनीही यावर आपले मत व्यक्त केले. भारताची सागरी दृष्टी ‘सागर’ धोरणापासून विस्तारित ‘महासागर’ चौकटीकडे विकसित होत असताना, अंडरवॉटर डोमेन अवेअरनेसची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे, असे ते म्हणाले. समुद्राखालील जग भविष्यातील सुरक्षा आणि समृद्धी निश्चित करेल, असे मत त्यांनी मांडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *