![]()
शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमला होता. या वेळी पोलिस आणि देवस्थान ट्रस्टकडून कडेकोट नियोजन करण्यात आले होते. ७० हजार भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांची आकडेवारी अशी होती : पहिला श्रावणी सोमवार सुमारे १ लाख भाविक, दुसरा श्रावणी सोमवार सुमारे ८० हजार भाविक तिसरा श्रावण सोमवार शुक्रवार ते रविवार या ३ दिवसांच्या सुट्टीचा मेळ आल्याने सुमारे १ लाख ५० हजार भाविकांनी दर्शन घेतले. चौथा (शेवटचा) श्रावणी सोमवार सुमारे ७० हजार भाविकांनी दर्शन घेतले. तीन सुट्ट्या, अधूनमधून पडणारा पाऊस आणि वेरूळ तीर्थकुंडापासून शूलिभंजनकडे निघालेली कावड यात्रा यामुळे चौथ्या सोमवारी इतर सोमवारच्या तुलनेत गर्दी थोडी कमी राहिली. कावड यात्रेमुळे संभाजीनगर मार्गे येणाऱ्या वाहनांना माळीवाडा मार्गे वळवले होते. प्रशासनाकडून कोणताही विशेष व्हीआयपी दर्शन पासची व्यवस्था नव्हती. फक्त राजशिष्टाचारतून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना होती. सर्व भाविकांना समान रांगेतूनच दर्शन देण्यात आले, मंदिर पहाटे १ वाजता उघडण्यात आले आणि रात्री १२ पर्यंत भाविकांसाठी खुले होते. पावसापासून संरक्षणासाठी वॉटरप्रूफ मंडप आणि नागमोडी बॅरिकेडिंग होते. मंदिर परिसरात ६४ सीसीटीव्ही आणि रस्त्यावर पोलिस प्रशासनाचे ५२ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आपला दवाखाना, वैद्यकीय पथक, जनसंपर्क कक्ष आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. यंदा प्रथमच महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान गर्दी नियंत्रणासाठी तैनात करण्यात आले होते. भाविकांसाठी केला नवीन मार्ग : भाविकांना सोयीस्कर व्हावे म्हणून मंदिरात दर्शन झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या संकल्पित समाधीमधून नवीन मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दर्शन रांग आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची गर्दी एकमेकांत मिसळत नाही आणि दर्शन अत्यंत सुरळीत झाले. हेच नियोजनाचे मोठे वेगळेपण ठरले. पूजा साहित्य, बेलफूल, हार, प्रसादाचा सुमारे १५ ते १८ लाख तर पार्किंग, हॉटेल, लॉजिंग, होम स्टे, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ: सुमारे २५ ते ३० लाख एकूण अंदाजित उलाढाल चारही सोमवारी ४० ते ५० लाख रुपयांपेक्षा जास्त झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत वेरूळ व्यापारी संघटनेच्या काही व्यापाऱ्यांकडून “पहिल्या तीन सोमवारच्या तुलनेत चौथ्या सोमवारी व्यवसाय कमी झाला. कावड यात्रेमुळे वाहने माळीवाडा मार्गे वळवल्याने आणि पार्किंगचे नियोजन नीट न झाल्याने छोट्या दुकानदारांना फटका बसला. मात्र, हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय चांगला झाला.
Source link
घृष्णेश्वरचरणी 70 हजार भाविक:श्रावणी सोमवार गर्दी असली तरी व्यवस्थापनाचे नियोजन यशस्वी, सर्व भाविकांना समान रांगेतूनच दर्शन