![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची शासनाने शुक्रवारी तारीख 11 तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ६५० गावातील सुमारे १५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी तातडीने ईकेवायसी करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची डोळे शासनाच्या कर्जमाफीकडे लागले होते. त्यानुसार शासनाने सन 2019 पासून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासनाने यापूर्वीच पात्र शेतकऱ्यांच्या दोन याद्या जाहीर केले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात ४४ हजार १७७, दुसऱ्या टप्प्यात २४ हजार शेतकऱ्यांना तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार तिसऱ्या टप्प्यात सुमारे पंधरा हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, शासनाने आज हिंगोली जिल्ह्यातील 650 गावातील पंधरा हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार आता एकूण तीन टप्प्यात जाहीर झालेल्या याद्यांमधून हिंगोली जिल्ह्यात सुमारे ८३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. दरम्यान या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन त्वरित ई-केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. तसेच, ज्या पात्र शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी त्वरित फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत बंधनकारक आहे, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही. यादीतील जे पात्र शेतकरी मृत पावले आहेत, त्यांच्या वारसांनी देखील ७/१२ वर नोंद करून घेणे आणि फार्मर आयडी काढणे या अनिवार्य बाबी त्वरित पूर्ण करणे गरजेचे असल्याचे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी स्पष्ट केले. सदर यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम, आधार प्रमाणीकरण किंवा फार्मर आयडीबाबत काही तक्रार अथवा शंका असल्यास, ते शेतकरी ऑनलाइन स्वरूपात flrs.maharashtra.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार दाखल करू शकतात, अशी माहिती हिंगोली जिल्हा उपनिबंधक फुपाटे यांनी दिली आहे.
Source link
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत 15 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर, e-KYC बंधनकारक