महाराष्ट्रात सध्या हवामानाचा मोठा लपंडाव सुरू असल्याचे चित्र आहे. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली, तरी अनेक जिल्हे अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात पावसाचा जोर वाढणार असून
.
आज कुठे बरसणार पाऊस?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मराठवाड्याची स्थिती: मराठवाड्यात हवामानात संमिश्र बदल दिसत आहेत. हिंगोली आणि परभणीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. राज्याच्या उर्वरित भागात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.
आजपासून पावसाचा जोर वाढणार राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा स्पष्ट इशारा हवामान खात्याने दिला आहे.
ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे (घाटमाथा) परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने थेट ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
इतर भागांत कसे असेल हवामान? पालघर, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावू शकतील.
नाशिक जिल्ह्याला ३ दिवसांचा ‘येलो अलर्ट’
नाशिक शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने नाशिकसाठी पुढील तीन दिवसांचा पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः जिल्ह्यातील घाटमाथ्यावर वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी आणि प्रवाशांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
पावसाच्या दडीमुळे बळीराजाची चिंता वाढली
एकीकडे कोकण आणि मुंबईत पावसाचे अलर्ट दिले जात असताना, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि पश्चिम विदर्भात मात्र पावसाने मोठी दडी मारली आहे. पावसाअभावी शेतातील पिके करपण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग अत्यंत हवालदिल झाला आहे. तसेच, वाढते तापमान आणि हवेतील दमटपणामुळे नागरिकही उकाड्याने प्रचंड त्रस्त झाले आहेत.
राज्यात हवामानाचा असा खेळ का सुरू आहे?
उत्तर आणि मध्य भारतावरून जाणारा मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सध्या बंगालच्या उपसागराकडे सरकला आहे. यासोबतच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हवामानाची ही प्रणाली महाराष्ट्रातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातवरून थेट अरबी समुद्राकडे सरकत आहे. याच कारणामुळे सध्या राज्यातील ठराविक भागांतच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
हेही वाचा..
MP – राजस्थानात मान्सून पुन्हा सक्रिय:JKत पुरामुळे 2 दिवसांत 23 जणांचा मृत्यू; गुवाहाटीत भूस्खलन, आसाममध्ये 1.7 लोकांना फटका

सततच्या पावसामुळे जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या दोन दिवसांत पुरामुळे मृतांची संख्या २३ वर पोहोचली आहे. पूरग्रस्त पूंछ आणि राजौरी भागात सात जण बेपत्ता आहेत. सततच्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आसाममधील गुवाहाटी येथे दरड कोसळण्याची घटना घडली. त्यानंतर, राष्ट्रीय महामार्ग-७१५ चा काही भाग पाण्याखाली गेला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, राज्यातील १२ जिल्ह्यांमधील १.७० लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. सविस्तर वाचा