बस्तरचे भूमिपुत्र, ज्येष्ठ अभ्यासक व लेखक राजीव रंजन प्रसाद यांनी ‘दिमागी नक्षलवाद’ हा देशासमोरील मोठा धोका असल्याचे मत व्यक्त केले. पुणे येथे विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित देवर्षी नारद माध्यम पुरस्कार वितरण आणि ‘नक्षलवाद: काल आणि आज’ या विषयावरील
.
नक्षलवादी विचारसरणी समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे त्यांना सहजपणे राज्य करता येते. चुकीच्या इतिहास लेखनामुळे आपली विचारपद्धती बदलली असून, सामाजिक विचारांकडे दुर्लक्ष होत आहे, असे प्रसाद म्हणाले. पंतप्रधानांनी ‘दिमागी नक्षलवादा’बाबत व्यक्तव्य केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती, याचाही त्यांनी उल्लेख केला.
माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्वतःला ‘अर्बन नक्षलवादी’ म्हटले असले तरी, गृहमंत्री असताना त्यांनी ‘अर्बन नक्षलवाद’ हा मोठा धोका असल्याचे म्हटले होते, असे प्रसाद यांनी निदर्शनास आणले. दिमागी नक्षलवाद हा देशासमोरील एक मोठा धोका असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि आदिवासी हे चार वर्ग नक्षलवादाच्या छायेखाली राहिले आहेत. नक्षलवाद्यांनी त्यांचा वापर करून आपला विस्तार केला. मात्र, आता शेतकरी, कामगार आणि आदिवासी वर्गाने त्यांची साथ सोडल्याने, विद्यार्थी वर्गाचा वापर आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या ऊर्जेचा वापर चुकीच्या दिशेने करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत प्रसाद यांनी व्यक्त केले.
विश्व संवाद केंद्रातर्फे पत्रकारिता व माध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय जोशी, डेक्कन एज्युकेशनचे अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे आणि कार्यवाह आनंद काटीकर उपस्थित होते.
यंदाचा मुख्य नारद माध्यम पुरस्कार महाराष्ट्र टाइम्सचे पुणे संपादक श्रीधर लोणी यांना प्रदान करण्यात आला. आश्वासक पत्रकारिता पुरस्कार सकाळचे पत्रकार मयुरेश प्रभुणे, प्रभातच्या वरिष्ठ पत्रकार अंजली खमितकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मोनेश शेलार यांना देण्यात आला.
लेखक राजीव रंजन प्रसाद यांनी सुरुवातीला नक्षलवाद देशात क्रांती घडवून आणेल असे वाटले होते, असे सांगितले. त्यासाठी बंदूक हाती घेऊन लाल किल्ल्यावर लाल निशाण लावण्याची मानसिकता होती, परंतु ही विचारधारा गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे नंतर स्पष्ट झाले, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यापूर्वी नक्षलवाद कसा निर्माण झाला आणि हिंसक कारवाईने तो कसा वाढत गेला, यावर त्यांनी प्रकाश टाकला. नक्षलवादाचा उद्देश देशात अराजकता निर्माण करण्याचा होता, त्याचा स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलवादाच्या माध्यमातून डाव्या चळवळी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्वातंत्र्यानंतर संविधानाने कामगार, आदिवासी, विद्यार्थी, महिला अशा सर्वांना आवश्यक अधिकार दिले आहेत. मात्र, ‘सत्ता बंदुकीतून निघते’ असे सांगत काही जणांनी संस्थाने एकत्रीकरणवेळी थेट भारतीय लष्कराच्या विरोधात लढण्यास सुरुवात केली, असेही प्रसाद यांनी नमूद केले.
