Headlines

'आधी शिक्षणमंत्री, नंतर थेट प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागणार':आझाद मैदानातून आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा; काय म्हणाले ठाकरे?




शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार या आगीत भस्म झाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले. तर आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, देशातल्या तरुण आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आज आंदोलने होत आहेत. आम्ही आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. पण ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे जाऊन आम्ही थेट या देशाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत, असा आक्रमक इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, सोनम वांगचुक यांनी या आधीही लडाखला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने लडाखच्या जनतेला तसे आश्वासनही दिले होते. मात्र, भाजपला लडाखची जमीन उद्योगपती अदानी यांच्या घशात घालायची आहे. याच कारणामुळे सोनम वांगचुक यांना या आधी आंदोलन करावे लागले होते. भाजपच्या घोषणा आता कुठे गेल्या? केंद्र सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, या देशातील जनतेने भाजपला देश बदलण्यासाठी आणि विकास करण्यासाठी बहुमत दिले होते. मात्र, हे लोक आता देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. इस्रोच्या 100 वैज्ञानिकांनी राजीनामा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जग कुठे चालले आहे आणि आपण कुठे आहोत? भाजपला इस्रोसारख्या महत्त्वाच्या संस्था सांभाळता येत नाहीत, पण दुसऱ्या पक्षांचे खासदार फोडण्यात ते व्यस्त आहेत. ‘हर घर जल’, ‘स्मार्ट सिटी’, ‘प्रत्येकाला घर’ या भाजपच्या घोषणा आता कुठे गेल्या? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. हे सरकार भूतकाळातील वाद उकरून काढत आहे महाराष्ट्राचा अभिजित दिपके हा तरुण मुलगा आज दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी उपोषणाला बसला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, ही त्याची प्रमुख मागणी आहे. मात्र, भाजप सरकार तरुणांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जनतेला धर्म आणि जातीच्या वादात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. जग पुढे जात असताना भाजप आपल्याला 50 वर्षांपूर्वी काय झाले, यात अडकवून नेहरू विरुद्ध सरदार पटेल असा भूतकाळातील वाद उकरून काढत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. हे सरकार राम मंदिर आणि पंढरपूर लुटण्याचे काम करतंय आदित्य ठाकरे म्हणाले, पुढच्या 10 वर्षांत देशात 120 कोटी तरुणांना नोकऱ्यांची गरज असेल, मात्र केवळ 40 कोटी तरुणांनाच नोकऱ्या मिळतील अशी स्थिती आहे. भाजपच्या नेत्यांची मुले परदेशात शिकायला आणि स्थायिक व्हायला जातील. मग आपल्या सर्वसामान्य तरुणांनी कुठे जायचे? हे सरकार राम मंदिर आणि पंढरपूर लुटण्याचे काम करत आहे. त्यामुळे या भाजपसारख्या देशद्रोही पक्षाला सत्तेबाहेर काढले पाहिजे. आता देशात एकच नारा लागला पाहिजे. आधी शिक्षण मंत्री प्रधानांचा राजीनामा आणि नंतर थेट प्रधानमंत्र्यांचा राजीनामा, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *